Monday, August 25, 2014

ब्रम्हराक्षसाच्या पाठी …

भित्यापाठी ब्रम्हराक्षस ! ही म्हण शिष्यवृत्ति परीक्षेला ची तयारी करताना चौथी मधे बऱ्याच वेळा घोकुन घोकून पाठ केली होती. म्हणायला खुप मजेशीर वाटायची.  नजरेसमोर असा दंडुका घेतलेला राक्षस एका "फाटलेली हातात घेऊन" पळणाऱ्या माणसाचा पाठलाग करतोय अस दृश्य यायचं, पण म्हणी चा अर्थ बऱ्याच अनुभवानंतर उमगला.  


जीवनात, बऱ्याचदा काही गोष्टी , अडचणी अशा असतात की त्या पार पडल्याशिवाय , सोडवल्याशिवाय पर्याय नसतो. पण आपण काहीतरी कारण काढून त्यांच्याकडे दुर्लक्ष करात राहतो ,उद्यावर ढकलत रहतो. खरे कारण हे असते की एकतर ती गोष्ट करायला आपल्याला अजिबात आवडत नसते ( सुरु करण्याच्या आधीच आपण काहीतरी पूर्वाग्रह करून  घेतलेला असतो) , किंवा एखादी अनामिक भीती असते की ती गोष्ट आपल्याला करायला जमणार नाही.  हळुहळू ती  गोष्ट अंधाऱ्या खोलीमधला कधीच न पाहिलेला राक्षस बनून जाते. जसजसे दिवस जातात तसतसे आपण त्या खोलीसमोरून रोज जातो पण दुर्लक्ष करतो, घाबरतो. पण तो विचार, कि आपल्याला आज ना उद्या त्याचा सामना करावा लागणार आहे , आपल्याला अस्वस्थ करून सोडत राहतो. दिवसेंदिवस तो राक्षस आपल्या दुर्लाक्षावर , भीतीवर पोसत मोठा होत जातो. अस्वस्थपणाची पुट मनावर चढतच राहतात . दुसऱ्या चांगल्या गोष्टींवर पण तो हळू हळू आच्छदायला लाग्तो.

शहाणी लोकं शेवटी कधी न कधी त्याला सामोर जातात, त्या बंद खोलीचं दार उघडतात त्याचा सामना करण्यासाठी , आणि शंभरापैकी नव्याण्णव वेळी तो राक्षस नाही तर एक भित्रा मरतुकडा उंदीर निघतो. मग वाटते कि ह्याला आधीच चेचून टाकले पाहिजे होते, उगाच एवढ्या दिवस वाट पहिली, अस्वस्थ झालो. कितीतरी चांगले क्षण वाया घालवले ह्याच्या नादात. उलट कमकुवत लोकं आपलं सगळं जीवन अशा काल्पोकाल्पित राक्षसांना घाबरून वाया घालवतात. बरीच उदाहरणं पहिली आहेत मी.

हे सगळं सुचलं कारण ऑफिस मधलं एक काम बऱ्याच दिवसांपासून करायचे राहिले होते. रोज चालढकल करीत होतो. उद्यावर ढकलत होतो. खरं कारण होतं कि ते काम मला आजिबात आवडत नव्हते.  डेडलाईन तर जवळ जवळ येत होती.  दुसरी कामं करताना पण तो विचार नेहमी डोकं कुरतडत असायचा . आज ठरवले की बास ! आता काही झाले तरी हे काम हातात घ्यायचे. आणि आश्चर्य काय २-३ तासांत अर्धे काम संपले. पहिल्याच दिवशी याला सामोरं गेलो असतो तर किती बरं झालं असतं . असो. …

विक्रम जाचक म्हणून एक मित्र होता माझा बारावीत . तो नेहमी म्हणायचा कि मी कुठल्याही विषयाचा अभ्यास दोन वेळा सुरु करतो. म्हणजे पहिला चाप्टर वाचून सोडून देतो. का? कारण Well begun is half done. दोन वेळा सुरु केले कि  संपला पूर्ण अभ्यास. निकाल आल्यावर मात्रं त्याला साक्षात्कार झाला कि Aristotle ने त्याची घोर फसवणुक केली आहे.  विनोद बाजूला ठेवला तर विक्रम ची थेअरी बरयाच अंशी बरोबर आहे.  एखादे काम पहिल्यांदा करावेसे नाही वाटले तर परत करायला घेतले पाहिजे . काय माहिती , दुसर्या वेळी ते एवढे सोपे वाटेल की खरच संपून जाईल .

किती तरी गोष्टींचा मी पण ब्रम्हराक्षस बनवून ठेवला होता . मोठ्या शहरात शिकायला जाण्याचा, लहानपणी घरी एकटा झोपण्याचा , सकाळी हिंस्त्र कुत्री असलेल्या गल्ली मधून मार्ग काढत शिकवणी ला जाण्याचा , इंग्लिश बोलण्याचा , चार लोकांमध्ये आपली मतं मांडण्याचा , अनोळखी व्यक्ती सोबत संसार थाटण्याचा , न आवडणारी नोकरी सोडण्याचा , पहिला विमान प्रवास करण्याचा , पहिल्यांदा मुंबई ला एकटे जाण्याचा, जेवण बनवायला शिकण्याचा , अगदी जवळच्या मित्रांपासून, व्यक्तींपासून दूर होण्याचा … एक नव्हे हजार गोष्टी. जोपर्यंत त्यांना सामोरं नाही गेलो तोपर्यंत त्या प्रचंड अशक्य वाटायच्या .

भीती अजूनही बऱ्याच गोष्टींची वाटते . नाही असं नाही . पण अनुभूवांती हे माहिती झालाय कि फक्त त्यांना सामोर जाण्याचा अवकाश आहे . त्या आपोआप दूर होतात. घाबरून पळून जातात .  ती जाहिरात आहे न कुठली तरी…  "डर के आगे जीत है ". एकदम बरोबर !!!

चला मग उघडणार ना ते दार?

No comments:

Post a Comment

marathiblogs