Tuesday, August 26, 2014

अहो गोविंदशास्त्री!

रविवारची अशीच एक सुस्तावलेली दुपार. पोटास तड लागेपर्यंत जेवण झालेलं. एक छानशी वामकुक्षी झालेली . फावल्या वेळात काय करावं असा विचार करताना सुचले कि चला, आज सतीश मामाला फोन करावा. सातिशमामा माझा सख्खा मामा. एका खेडेगावी शिक्षकाची नौकरी करतो. बऱ्याच गमती-जमती सांगत असतो तिकडच्या . फोनवर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मामा म्हणाला "अरे एक सांगायचं विसरलो. तुझा एक बालमित्र भेटला मला २ दिवसांपूर्वी. कोण असेल सांग पाहू?". आता हे गेसिंग चे गेम मला फार बोर होतात , उगीच त्याचे मन राखण्यासाठी मी २ मिनिटांचा पॉज घेतला, आणि म्हणालो " नाही बाबा ओळखता येत, सांग तूच !". मामा म्हणाला "अरे , तो गोविंद!". माझी सुस्ती एकदम उडाली, उत्सुकता , कुतुहूल अनेक प्रश्नांनी मन भरून गेलं ग़ोविन्द्ला भेटून , त्याच्याबद्दल काही ऐकून जवळपास वीस वर्षं उलटली होती . टिपिकल हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात तसं मी काही वेळासाठी flashback मध्ये गेलो.



माझे शालेय शिक्षण झाले  एका अगदी छोट्या खेडेगावामध्ये . आई आणि वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे घरात थोडं शिक्षणाला पूरक वातावरण होतं . लहानपणापासूनच लिहिण्याची, वाचण्याची , अभ्यासाची गोडी होती . शाळेत एक बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी होतो. पण एक प्रॉब्लेम होता , मी कितीही घासून अभ्यास केला तरी नेहमी दुसरा नंबर यायचा वर्गात. कारण माझा मित्र गोविंद म्हणजे पहिला नंबर असं समिकरण होतं . अत्यंत कुशाग्र , तल्लख बुद्धीचा हा पोरगा. गणित म्हणजे तर त्याचा जीव कि प्राण . जणू आईच्या पोटातून शिकून आलाय. मोठी अवघड गणितं चुटकीसरशी सोडावयाचा .  माझी एक मावशी गोविंद घरी आला कि त्याला मजेत "अहो गोविंदशास्त्री!" अशी हाक मारायची . तो बिचारा कावराबावरा होऊन जायचा . मला जाम हसू फुटायचं .
                                 गोविंद माझा अत्यंत चांगला मित्र. आमच्यात कधी कोम्पीटिशन नसायची  . ( एक कारण हे हि होते कि तो फारच हुशार होता). पण तरीही त्या वयात जसा वाटतो तसा त्याचा हेवा वाटायचा कधीकधी . वाटायचं ह्याच्यामुळेच आपला कधी पहिला नंबर येत नाही. ह्याचा वडिलांची कुठेतरी बदली झाली पाहिजे, ह्याने शाळा बदलली पाहिजे असे एक नाही हजार विचार यायचे . आता विचार करून हसू येते. आमची मैत्री बाकी एकदम गाढ . दिवसभर त्याच्या घरीच पडीक असायचो . अस्सा मोठ्ठा वाडा . शेणाने सारवलेली जमीन. गोठ्यात दोन काळ्या कुळकुळीत दुभत्या म्हशी . ढणढणत्या चुलीवर भाकऱ्या थापणारी त्याची आई . त्याचे पहिलवान आजोबा . अगदी छान वातावरण होतं ते. खूप खेळायचो . एकत्र अभ्यास करायचो. भांडायचो हि  भरपूर , आणि दुसऱ्या दिवशी परत खास मित्र होवून जायचो.
                          नववीला असताना मी ते  गाव  सोडलं आणि जिल्ह्याचा ठिकाणी शिकायला गेलो . गोविंद तेथेच राहिला . हळूहळू नवीन मित्र झाले .  गोविंद ला विसरायला होवू लागले . दहावीचा निकाल लागला , मला बऱ्या पैकी मार्क्स पडले , अपेक्षेप्रमाणे गोविंद ला खूपच चांगले मार्क्स पडले . योगायोगाने आमचे एडमिशन  एकाच कॉलेजमध्ये झाले . एडमिशन चे सोपस्कार पार पडल्यावर त्याचे वडील त्याला घेऊन माझ्या घरी आले. माझ्या वडिलांनी विचारले "कुठले विषय घेतले तू गोविंद ?". यावर त्याच्या डोळ्यात पाणी तरळले . काहीच नाही बोलला तो. त्याचे वडील म्हणाले "Crop Science ! डॉक्टर बनवायचेय ह्याला . म्हणून गणित वगैरे नाही घेतले विषय . " माझे वडील म्हणाले " अहो , पण त्याला गणित एवढे आवडते ना ?, त्याला विचारले का तुम्ही ?" ते म्हणाले "त्याला काय विचारायचे , अहो ते देशपांडे डॉक्टर बघा , एका पेशंट चे २० रुपये घेतात  तपासायला . दिवसभर पेशंट ची रीघ असते त्यांच्याकडे . काय मान आहे गावात त्यांना . पैशांच झाड आहे झाड त्यांच्याकडे ". माझे वडील निरुत्तर झाले .
                       अधून मधून कधीतरी कॉलेज मध्ये भेटायचा गोविंद . उदास असायचा . गप्प गप्प राहायचा, फारसं बोलायचा नाही . माझ्या आई ला हे सांगितल्यावर म्हणाली " अरे , पहिल्यांदाच घराच्या बाहेर राहिलंय तो. नवीन शहर , नवीन कॉलेज . घराची आठवण येत असेल तत्याला . असं कर तू त्याला घरी घेऊन ये रविवारी . राहू दे इथेच दिवसभर . मन रमेल त्याचे ". त्या रविवारी घरी आला तो, पण शून्यात नजर लावून बसला . फार बोलला नाही . लगेच निघून गेला जेवण करून .  हळू हळू मी माझ्या जीवनात गुंतून गेलो. भेटी गाठी कमी झाल्या आमच्या . अकरावीचा निकाल लागला , गोविन्द्ची आठवण आली . निकालाच्या यादीत मात्र त्याचे नाव कुठेच नव्हतं . तोही कॉलेज  मध्ये दिसेनासा झाला होता .  काही दिवसांनी त्याचे वडील भेटले आम्हाला . गोविंद ची विचारपूस केल्यावर त्यांचा चेहरा खर्रकन उतरला . म्हणाले "वाया गेला पोरगा .वाट्टोळ करून घेतलं !  अभ्यास, कॉलेज सगळं सोडून दिवसभर देव्हारया समोर बसून असतो. कोणाशी बोलत नाही, काही नाही ". गोविंद वर कसला तरी अनामिक ताण, दडपण आलं होतं . मानसिक रित्या अस्वस्थ झाला होता तो. स्वतःभोवती एक कोश विणून घेतला होता त्याने. ४-४ तास देवाची पूजा करायचा . शिक्षण तेथेच सोडले त्याने !
                               काळाच्या ओघात मीही विसरून गेलो त्याला, आणि आज अचानक त्याची आठवण ताजी झाली .मामाला विचारले "कुठे भेटला तुला तो ? काय करतो सध्या ? कसा दिसतोय? " त्यांनी  सांगितले कि  मामाला शाळेच्या कामानिमित्त एक पार्सल पोष्टात द्यायचे होते.  पोष्टात चिटपाखरू नव्हते.  एक मळक्या युनिफॉर्म मधला पोष्टमन जमिनीवर पेपर अंथरून झोपला होता . (आजकाल खेडेगावी पण पोष्ट रिकामं असतं . मोबाईल फोन ची क्रांती! ). मामानी त्याला उठवलं आणि पार्सल दिले . पोष्टमन ने तंबाखू वगैरे मळली आणि गप्पा सुरु केल्या . बोलण्याबोलण्यात समजले कि तोच गोविंद होता . माझा बालमित्र . अगदी आपुलकीनं माझी विचारपूस केली त्याने . लग्न झालेले त्याचे, २-३ मुलं पण आहेत . कसाबसा संसाराचा गाडा ढकलतोय . अजूनही तास न तास देवाची पूजा करतो .  बोलण्यातून हे पण समजले, कि त्याच्या मनावर परिणाम झाला असं समजून घरच्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. मानसिक आजार बळावत गेला . कसेबसे लग्न उरकून टाकले, ह्या भ्रमात कि जबाबदारी पडल्यावर तर नीट वागेल. पण त्यात काही फारसा फरक नाही पडला .शेवटी कशीबशी , ओळखीने, त्याला एक पोष्टमन ची नौकरी लावली त्याच्या वडिलांनी . आणि संसार चा गाडा ढकलायला मदत केली .
                   त्याचा फोन नंबर घेतला मामाकडून आणि लगेच त्याला फोन केला . बायकोनी उचलला असावा . म्हणाली पूजा करत आहेत. नंतर करा २ तासांनी . परत  फोन केला . अगदी उत्साहात बोलला तो . शेवटी म्हणाला "फार पुढे गेलास महेश, तू मला मागे टाकून . मी बसलोय बघ इथे पत्रं वाटत, शिक्के मारत . " काय बोलावे समजेनासे झाले मला . उगीच  त्याला चांगले वाटावे म्हणून म्हणालो "काही म्हण यार, तुझ्यासारखा गणित तज्ञ नाही भेटला गोविंद".  एकदम उदासीन स्वरात तो उत्तरला "कशाचं काय राव, आयुष्याचं गणित चुकलं सगळं ".  गलबलून आलं आणि पुढे काही बोलावलं नाही . फोन ठेवून टाकला निरोप घेवुन.
              उगाच अस्वस्थ वाटायला लागले. विचार केला ह्या गोष्टीत चूक कोणाची? त्याच्या पालकांची, त्याच्या मनाविरुद्ध स्वप्नं पहिली त्यांनी म्हणून ? त्याला कधी समजून नाही घेतलं म्हणून .  कि गोविंदची चूक आहे, परिस्थिती समोर कमकुवत झाला म्हणून? कि त्या देव्हाऱ्यातल्या दगडाच्या देवाची, जो ढिम्म बसून सगळं पाहत बसला? गोविंद तासंतास हेच प्रश्न तर नसेल न विचारात त्या देवाला?
वाटले कि या वेळी भारतात गेलो कि वेळ काढून गोविंद ला नक्की भेटू . थोडा वेळ विचार केला आणि मग मात्र ठरवले कि नकोच. कधीच नको भेटायला त्याला. माझ्या आठवणींमध्ये असणारा गोविंदच बरा आहे. तो तसाच ठेवायचाय . मामाला केलेला फोन विसरून जायचा आहे . घराच्या छतावर हुंदडणारा , घातांक , अपूर्णांक , व्यास, क्षेत्रफळ यात रमणारा, (७५३ X ५६४ / ३६३) चे उत्तर क्षणात सांगणारा, तेजपुंज डोळ्याचा, "अहो गोविंदशास्त्री " म्हटलं कि लाजणारा गोविंद…  तो तसाच आठवणीत ठेवायचा आहे मला . तो पहिला नंबर अजूनही त्याच्याचसाठी राखून ठेवायचाय मला…!

[काही पात्रांची नाव बदलली आहेत. ]






    

11 comments:

  1. hi mahesh,
    never knew nor can i imagine that your are such a good writer and observer, tu to chupa rushtum nikla!!!.
    nice ! such hobby add happiness and peace to our life .
    good keep it up!!
    all the best for your future writngs

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Madhu. Very happy to hear that you liked it. Please keep visiting.

      Delete
  2. myself ,anil and sagar read this blog govindsashtri
    it is really nice and touching
    salute to your observation and command over marathi language!

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. Thanks man. Tum logon ko pasand aaya... Aur kya chahiye life mein!

      Delete
  3. Excellent write up Mahesh. There are some people who will always remain first for us, no matter what. It's been a long time since I met with a dear friend, you can say my soulmate and these days, we are not in touch really. Your article made my eyes moist...

    ReplyDelete
  4. Hey Mahesh!
    Ravi told me about ur writing skill..I gone through..u really did excellent..ur GOVINDSHASTRI is touchy..best wishes..

    ReplyDelete
  5. Harish, good to know that you liked it. Keep visiting!
    Cheers

    ReplyDelete

marathiblogs