Friday, December 5, 2014

कॉफी विथ करन !

"ड्रेस कसला सुंदर आहे गं तुझा ! इंडियाहून घेतलास का?"
"थैन्कस !  हो, मागच्या वेळी मुंबई ला गेले होते, तेंव्हा घेतला. ते पानेरी नावाचं एक छान दुकान आहे बघ अंधेरीला."
"अगदी कुछ कुछ होता है मधल्या काजोल सारखा आहे बघ ! आठवला ना ? "
"ओह, हो का ? नाही आठवत बुवा !"  सौ मनातून स्वतःच्या खरेदीवर खुश होत म्हणाली.

बायका, आणि त्यांचे निरीक्षण ! फक्त हिरोईन चे कपडे , दागिने , नवीन डिजाईन्स  इकडेच लक्ष असते. पिक्चर मरो तिकडे. असो…  लुसलुशीत पनीर कबाब वर मी अजूनच जास्त लक्ष केंद्रित केले आणि मन लावून खायला लागलो. तसंही चार बायका एकत्र आल्या कि त्यांच्या शॉपिंगच्या गप्पा ऐकणे यासारखी निरस गोष्ट कुठली नसेल. बीअर पण संपत आली होती. ती रिपीट करण्यासाठी वेटरला माझे डोळे चातकाप्रमाणे शोधत होते.  बायकांच्या गप्पा सुरूच होत्या.

"काय मस्त पिक्चर होता ना केकेएचएच ?"

जोरात ठसका लागला मला. माझ्या अभिप्रायाप्रित्यर्थ माझ्याकडे बघणाऱ्या चेहऱ्याकडे कसनुसे हसत बीअरचा एक घोट रिचवला. नाही म्हणावं तर रूड दिसेल, हो म्हणावं तर मन नाही मानणार. अशा वेळी ठसके कसे देवासारखे धावून येतात.

"करन जोहर किती छान सिनेमे बनवायचा ना आधी. पण काय झाले काय माहिती त्याला ? तो फालतू कभी अलविदा ना कहना बनवला. तेव्हापासून मी त्याचे पिक्चर बघायचं सोडून दिलं., नाहीतर काय ?"

गरमागरम कबाबला तोंडापर्यंत पोचवणारा माझा हात तिथेच थबकला. सहन करावं हो माणसानी , पण किती? चक्क कभी अलविदा ना केहना ला फालतू म्हणावं कुणीतरी? अंगात बाजीप्रभूंनी संचार करावा तसं वाटून संभाषणात आवेशाने उडी घेतली मी.

"का………य?, फालतू चक्क ? मला वाटते करन जोहर ने एकच चांगला आणि सेन्सिबल पिक्चर बनवलाय आणि तो म्हणजे कभी अलविदा न कहना!" मी तावातावाने म्हणालो .
"काही काय म्हणतोस. काहीही दाखवलंय त्यात. तो अभिषेक बच्चन एवढा चांगला असतो, आणि राणी मुखर्जी तरीही शाहरुखच्या प्रेमात पडते. असं कधी होत असते का ?
"हो ना, काय संदेश जातो असल्या पिक्चर मधनं. समाजावर काय परिणाम होतील."
"मूर्खपणा दाखवलाय सगळा !" 
"तसाच आहे तो शाहरुख, नेहमी दुसऱ्याची बायको नाहीतर प्रेयसी पळवतो. अगदी कुठलाही पिक्चर घ्या त्याचा!"

बघता बघता शत्रुपक्षाने चढाई केली. अगदी एकाकी पाडला मला सगळ्यांनी. मी काही बोलायच्या आतच एकजण   अस्मिताला  म्हणाली -
"सांभाळ गं बाई नवऱ्याला. नको तसले पिक्चर आवडायला लागलेयत त्याला !"
हास्याच्या फवाऱ्यात माझे शब्द हवेतच विरून गेले. त्यामुळे मी अजून काही बोलण्याचा नाद सोडून दिला आणि वेटरला पुढच्या बीअरसाठी इशारा केला.

पार्टी संपवून घरी आलो. पण ते संभाषण काही माझ्या डोक्यातून जायला तयार नव्हते. आता करन जोहर तसा बऱ्यापैकी सिनेमे बनवतो (म्हणजे तसा एकच). कुछ कुछ होता है एक बरा सिनेमा होता. मी इंजीनीअरिंग च्या शेवटच्या वर्षी असताना आलेला. तेव्हा ते वयच तसं होतं कि आवडावा सिनेमा.  नंतर थोडी समज यायला लागली तेव्हा त्या पिक्चर मधला फोलपणा अधिकाधिक ठळक व्हायला लागला. सगळी स्वप्नाची दुनिया. श्रीमंत बापांची श्रीमंत पोरं. पैसे कमवायचे/अभ्यासाचे टेन्शन नाही. 'प्यार दोस्ती है'  वगैरे डायलॉग मारत, हातावर टाळ्या आणि नाकावर टिचक्या देत , कोपरापर्यंत फ्रेंडशीप बैन्ड बांधून प्रेम करतात. डोकं फिरल्यासारखं ती काजोल लग्न न करता थांबते शाहरुखसाठी. जणू राणी मुखर्जी मरायचीच वाट बघत होती. राणी पण अगदी कन्विनिअन्टली टाईम वर देहत्याग करते. वर ती अति शहाणी ८ वर्षाची पोर, अकाली प्रौढत्व आलेली. आज्जीबाई सारखी बडबड करते. सलमानची एन वेळी फजिती करून शेवटी यांचं लग्न वगैरे. आकाशातले तारे वगैरे पण एकदम टाइम वर तटातटा तुटतात. अरे काय पांचट पणा लावलाय? असले पिक्चर पब्लिक ला जाम आवडतात. माझ्या एका मित्राने पिक्चर संपल्यावर अगदी मार्मिक विश्लेषण केलं होतं. म्हणाला

"एकदम अन एक्सपेक्टेड स्टोरी निघाली यार!"
"का रे ?"
"नाहीतर काय, हॉरर पिक्चर होता राव. राणी मुखर्जीचं भूत दाखवलंय त्यात !"

लोकांना असे पिक्चर आवडतात कारण लोकांना स्वप्नाची दुनिया आवडते. असं काही नसतं हे माहित असूनसुद्धा , माणसं स्वतःला त्या पिक्चर मध्ये कुठेतरी हुडकण्याचा प्रयत्न करतात.  स्वतःला सुखावून घेतात.  ताण तणावाच्या जीवनात तेवढेच थोडे विरंगुळ्याचे क्षण! खोट्या स्वप्नांमध्ये रमून जातात. हिरो हिरोइन चं सुखकर आयुष्य बघून,
हैप्पी एंडिंग्ज बघून समाधानी होतात.  सत्य परिस्थितीचा काही एक संबंध नसतो अशा पिक्चरचा.  संस्कार , समाजाला संदेश वगैरे म्हणाल तर त्या नावानं शंख आहे सगळा.  कसला संदेश देतो हो हा पिक्चर सांगा बरं मला. कुणाचेतरी लग्न सुरु आहे आणि तिथे जाऊन ते मोडून त्याच्या होणाऱ्या बायकोशी लग्न करा? आणि ते का तर , हिच्यापेक्षा जास्त कुणीतरी आवडत होती म्हणून आठ वर्षापूर्वी हिला नाकारली होती. आणि आता बायको मेल्यावर, लगेच चान्स मारून घ्यायचा.  कि ८ वर्षांच्या मुलांनी बापाचे हरवलेले प्रेम हुडकायचे, हा संदेश? की इकडे एखाद्याला लग्नाचे वचन देऊन , समर कॅम्प मध्ये जुन्या मित्राला भेटून पावसात नाचायचे वगैरे, ते पण नको तेवढे जवळ येउन.  कम ऑन , स्टौप फूलींग योरसेल्वज!

ढोंगी झालो आहेत आपण. स्वतःला फसवून फसवून एवढे एक्स्पर्ट झालोयत की , आता तसं काही करतोय ,त्याची जाणीव हि नाही राहिली. सत्य परिस्थिती चा सामना नाही करू शकत आपण. त्यापासून लांब पळतो. कारण सत्य आपल्याला आपण काय आहोत याची जाणीव करून देते.  आणि मग कारण नसताना अपराधाची भावना मनात येते. कोण सांगितलीय ती उठाठेव? म्हणून बरं का, आम्हाला ना कुछ कुछ होता है जाम आवडतो, पण कभी अलविदा न कहना … रीडीक्युलस, अगदी नो नो !

उलट , कभी अलविदा न कहना चे वेगळेपण ह्या अशाच सगळ्या पिक्चर्स मुळे उठून दिसतं. मी असं म्हणत नाही की अगदीच सुंदर चित्रपट आहे तो. पण दमदार कथा आहे. विचार करायला लावणारी. वास्तवातली.  सत्य परिस्थितीशी समझोता ना करणारी. आणि संदेश वगैरे म्हणाल तर ते काही पिक्चरच काम नाहीये हो. पिक्चर म्हणजे मनोरंजनाचे एक साधन आहे. त्यात कसला संदेश आलाय , डोंबल ! संदेश हवाय , चांगले विचार हवेयत तर चांगली पुस्तकं वाचा , देवभक्ती करा. भक्तीपर चैनल्स लावून बसा दिवसभर. संदेश कसला घेताय पिक्चर मधनं. त्यापेक्षा कॅमेरा वर्क एप्रिशियेट करा, लेखकाची ताकदवान स्क्रिप्ट पहा. तेवढ्याच कौशल्याने दिग्दर्शक ती कथा कशी मांडतो आपल्यासमोर ते बघा. कुठेतरी ह्रदयाला एखादा प्रसंग हलवून सोडतो की नाही ते बघा. मोजक्याच शब्दात बरंच काही सांगून जाणारे डायलॉग, त्याचं कौतुक करा. 

खूप बोलायचंय कभी अलविदा ना कहना वर. पण जास्त मोठे मोठे ब्लॉग नाही लिहायचे असं ठरवलेय. काहीजणांनी सुचवले की फारच लांबलचक होतात. म्हणून भाग-२ मध्ये "के ए एन के " बद्दलची माझी मतं ! लवकरच भेटीन !
(क्रमशः)

No comments:

Post a Comment

marathiblogs