Saturday, September 20, 2014

गुंतागुंत - (पार्ट -२)

पार्ट -१ इथे वाचा.

"सत्याएन्शी रुपये साठ पैसे झाले साहेब",  या वाक्याने जाग आली अभयला. रिक्षात झोपी गेला होता तो. स्टेशनहून ससूनपर्यंत रिक्षा पोचली, तेव्हाच झोप लागली बहुतेक आपल्याला. शंभराची नोट रिक्षावाल्याचा हातात देत म्हणाला "राहू द्या काका वरचे चहा पाण्याला", आणि घराकडे वळला. प्रवासानी अंग शिणून गेलं होतं. काश्मीर पासून पुणे, कितीही नाही म्हटलं तरी थकवणारा प्रवास होता. नेत्राला वाटेत डेक्कन वर ड्रोप करून आला होता. संध्याकाळी भेटायचं पण ठरलं होतं त्याचं. घरी जाऊन आता एक मस्त झोप काढणार होता तो .


अकरा वाजता जाग आली. उठल्या उठल्या खालच्या एसटीडी बूथ वर गेला आणि नेत्राला फोन केला. काही विषय नव्हताच बोलायला , आत्ता चार तासांपूर्वीच भेटलेले, तरीही अगदी अर्धा तास गप्पा मारल्या. राहिलेल्या कॉईनसचं काय करावे हा विचार करतानाच अभयला वाटले कि चला अबोलीला फोन करूया. तिलाही हि गोड बातमी सांगितली पाहिजे. त्याची प्रत्येक गोष्ट आधी अबोलीला माहित असायची. तिचा नम्बर फिरवला, तिकडून मंजुळ आवाज आला 
"अबोली हिअर"  
"अगं , अभय बोलतोय"
काही क्षण पिन ड्रौप सायलेन्स. 
"बोल रे , कशी झाली काश्मीर ट्रीप ?"
"तुला कसं माहिती ट्रीप बद्दल?"
"अरे, मंदार ने जायच्या दिवशी फोन केला होत. त्यानेच सांगितलं तू पण येतोयस सोबत"
एकदम सूर पालटला तिचा. 
"आणि आपलं फोन नाही करायचं ठरलं होतं अभय? का अवघड करून ठेवतोयस सगळं ?"
"अगं , ऐकून घे. तुला खूप खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. एक काम कर, आज ऑफिस नंतर शिवसागरला भेटूया. पुढे काहीच विचारू नकोस. बाय"
एवढे बोलून अभयने फोन ठेवला. आज जवळपास दीड -दोन महिन्यांनी बोलले होते ते. 

आज ऑफिस ला उशिराच जाणार होता तो. असं करू , अबोलीला "शिवसागर" मध्ये भेटू साडे सहाच्या सुमारास. एखाद्या तासांनी , आठ वाजता नेत्रा सोबत जवळपासच डिनर घेऊ. कामात मन लागत नव्हतं आज. अबोलीला कधी एकदा नेत्राची आणि त्याची बातमी सांगतोय असा झालं होतं. कुठलीही गोष्ट तिच्यासोबत शेअर केल्याशिवाय चैन नाही पडायची अभयला. ठरलेल्या वेळेआधीच, जाऊन पोचला शिवसागर वर, सहा पस्तीसला अबोली आली. दिवसभराच्या कामाच्या थकव्यानी असेल बहुतेक पण एकदम थकल्यासारखी दिसत होती. अभयला पाहून जाम खुश झाली. 
"काय गं , विरहात वेडी झाली का माझ्या?" मिश्किल स्वरात अभय म्हणाला. 
"नाही रे , तू गेल्यापासून एवढे चौइस मिळालेत कि , कुणाला निवडावे या विवंचनेत आहे." हसत हसत ती मिळाली. 
एका क्षणात रुसवे, फुगवे पळून गेले. असेच होते दोघंही . कितीही दिवसांनी भेटले तरी अवघडलेपणा आजीबात नसायचा. नातंच तसं होतं त्यांचं. काश्मीर ट्रीप च्या गप्पा सुरु झाल्या. तोपर्यंत , गरमागरम  वडा सांबारच्या डिश आल्या टेबलवर. 
"बोला , काय गोष्ट सांगायची आहे? अतिरेकी वगैरे झालास का तिकडे जाऊन?"
"अतिरेकी तर तू आहेस , कामाचा अतिरेक करतेस"
"गप्प रे, सांग आता जास्त उत्सुकता ताणू नकोस. ए पण ऑन अ सिरिअस नोट, तू खूप वेगळाच दिसायला लागला आहेस. असं काहीतरी समाधान, आत्मविश्वास, आनंद झळकतोय तुझ्या चेहऱ्यावर"
"Thanks, अगं गोष्ट अशी आहे , कि मी प्रेमात पडलोय"
"काय, खरंच ? कोणाच्या ? आय होप एखाद्या मुलीच्या !" डोळे मिचकावत म्हणाली ती. 
"हो , नेत्रा !"
"काय?" काही क्षण काहीच बोलली नाही ती. 
"हिरा आहे रे हिरा ती पोरगी. कसली छान चोइस आहे तुझी. मी खूप खुश आहे , फायनली यु मेड अ राईट डिसिजन एंड चोइस. "
तो भरभरून बोलायला लागला त्याच्या आणि नेत्राबद्दल. काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. ते कसे भेटले, त्याचं आजारपण , तिने पकडलेला त्याचा हात सगळं काही नॉन स्टोप सांगत सुटला. अबोली नुसतं कौतुकाने ऐकत होती. घड्याळात पहिले अभयने तर पावणे आठ झालेले. 
"अगं , किती बोलतोय मी एकटाच. बहुतेक आता निघावे लागेल, नेत्रा येईल आठ वाजता सुभद्रा वर."
"ओके , लगेच संपवते कॉफी " ती म्हणाली
"काय गं अबोली , पण तू काय ठरवले आहेस पुढचे?"
कडक उन्हं पडलेली असावीत , ढगांचा मागमूसही नसताना अचानक धो धो पाऊस पडावा तशी अचानकच ती रडायला लागली. गांगरून गेला तो. 
"अगं काय झालं?"
ती काहीच बोलायला तयार नव्हती. नुसती रडत होती. काही सुचेनासं झालं अभयला. 
 "सॉरी रे , मी खूप वाईट आहे बहुतेक. पण तू सांगितलंस हे सगळं , आणि खुश होण्याच्या ऐवजी खूप वाईट वाटतंय मला. खूप राग येतोय नेत्राचा अन तुझा. खूप एकटे एकटे वाटायला लागलंय. विसरणार तर नाहीस ना रे मला?  तुझ्याशिवाय गेले दोन महिने कसे गेले माझे मलाच माहिती. सॉरी रे ! मी काय बोलतेय आणि काय करतेय हे? बहुतेक ही माझी जेलसी आहे. प्रत्येक मुलीच्या जीवनात एक असा क्षण येतो , कि एखाद्याला ती सर्वस्व बहाल करते. भरभरून प्रेम देते, मी ते तुझ्यावर केलं होतं. पण बहुतेक आपल्या नशिबी सोबत राहणं नाहीये. आणि मीच कारणीभूत आहे त्याला . चल, बेस्ट लक नेत्राला आणि तुला !" 
असं म्हणत मागच्या वेळेसारखीच कॉफी अर्धी टाकून निघून गेली. सुन्नं होवून बसून राहिला अभय बराच वेळ तिथे. काहीच सुचेनासं झालं त्याला. काय गुंतागुंत होऊन बसली हि सगळी. च्यायला आपल्या जीवनात कुठली गोष्ट सरळ म्हणून होत नाही. शापित आहे जीवन सगळं. त्याच विचारात घाईघाईत सुभद्रा वर जाऊन पोचला. नेत्रा आधीच हजर होती. एकदम छान सजून आली होती. सोबत गुलाबाचं एक सुंदर फुल पण आणलं होतं त्याच्यासाठी. 
"का रे , किती उशीर हा? लग्नानंतर हे चालू नाही देणार!"
कशाने काय माहिती पण त्याचा मूड मगाच्या गोष्टीमुळे अगदी ऑफ झाला होत. उगीच लटके हसू चेहऱ्यावर आणून हसला तो नेत्राकडे पाहून. "सॉरी " एवढंच म्हणाला. 
"अरे , कशी दिसतेय मी? बघ तुझ्या आवडीच्या रंगाचा पिंक ड्रेस घातलाय"
अभयच लक्षच नव्हतं. 
"अगं , हो ना कसली छान दिसतेयस. वॉवं !"
"हे बघ अभय, मला सरळ दिसतेय कि काहीतरी बिनसलंय तुझं आज. तसं असेल तर डिनरचा प्लान क्यान्सल करू आपण "
"नाही गं , पुण्यात गाडी चालवणं म्हणजे डोकं भंजाळून जातं. सॉरी. चल, जाम भूकेजलोय . "
अभयने पूर्ण प्रयत्न घेतले मूड परत आणायचे . बऱ्याच अंशी त्याला त्यात यशही मिळाले. नेत्रा एकदम खुशीत होती. "पुढच्या महिन्यात मी चाललेय सुरतला, काकांशी बोलीन तेव्हा. तू पण बोलून घे घरी तुझ्या. "
"हो चालेल" म्हणून अभयनी तिला तिच्या घरी सोडलं.   
घरी पोचल्यावर त्याला झोपच यायला तयार नाही. अबोली सोबतची ती भेट राहून राहून आठवायला लागली. अबोली आपल्यावर अजूनपण खूप प्रेम करते. वेड्यासारखं अगदी. तिला फक्त समजत नाहीये कि काय महत्वाचे आहे तिच्यासाठी जीवनात. आपल्याला कोण आवडते खरंच? अबोली कि नेत्रा? आपण चूक करतोय का नेत्राला वचन देऊन. कदाचित अबोली ला वाईट वाटावे म्हणून तर आपण नाही न नेत्राला प्रपोज केले? कि खरंच प्रेम आहे आपले नेत्रावर? कि फक्त एक कोम्प्रमाइज केलंय आपण तिला लग्नाच वचन देऊन? आपल्याला नेत्राच्या प्रेमाबद्दल एवढ्या शंका का येत आहेत ? अबोलीच आहे का आपलं खरं प्रेम ? तिला एवढे वाईट वाटतंय त्याचं आपल्याला का एवढं वाईट वाटतंय? काहीच समजेना झालं त्याला. जाम टेन्शन आले. रात्रभर जागाच होता अभय. 

त्या दिवशीपासून , अबोलीने फोन घेणंच बंद केले त्याचे. पण त्या दिवशी तिनं ,तसं बोलून इक्वेशन बदलून टाकले होते सगळे. नेत्राला हळू हळू इग्नोर करायला लागला अभय. भेटीगाठी टाळू लागला. नेत्राने बरेच खोदून खोदून विचारले पण अभयने काही सांगितले नाही. एक दिवशी अचानकच त्याचा घरी येउन थडकली नेत्रा. 
"काय रे अभय , काय झालेय? फोन वर नीट बोलत नाहीस, दिवस रात्र ऑफिस मध्ये बिझी असतोस. आधीसारखं हसून बोलत नाहीस?"
"नाही गं तसं काही नाहीये. जरा काम जास्त आहे एवढेच"
"बरं , ऐक उद्या मी सुरत ला चाललेय. काकांशी बोलून झाल्यावर, ते तुला फोन करतीलच"
गप्प बसला अभय. शेवटी धीर एकवटून म्हणाला 
"नेत्रा , तुला काहीतरी सांगायचं आहे. नीट ऐक. आणि प्लीज रडू नकोस"
घाबराघुबरा चेहरा झाला नेत्राचा. कशीबशी आवंढा गिळून म्हणाली 
"बोल"
"हे बघ नेत्रा, मी आपल्या दोघांबद्दल बराच विचार केला. आणि काही कारणास्तव मला असं वाटतेय कि खूप घाई होतेय लग्नाची वगैरे. बहुतेक मला अजून विचार करायला वेळ पाहिजे. भावनेच्या भरात मी लग्नाला हो म्हणून गेलो , पण मला वाटतेय कि आय एम नॉट रेडी यट"
चक्रावून गेली नेत्रा . धीर सुटला तिचा. 
"अरे काय बोलतोयस तू हे अभय? तुला कळतंय का काही ? भातुकलीचा खेळ आहे का हा? क्षणात हो आणि क्षणात नाही ? तुला दुसरं कुणी आवडायला लागलंय काय?"
"ते महत्वाचं नाहीये नेत्रा. पण मला वाटते कि तू तुझ्या घरच्यांच्या मर्जीप्रमाणे लग्न करून टाकावे. तू जास्त खुश राहशील. मी नाही लग्न करू शकणार एवढ्या लवकर. आणि मला विचार करायला पण वेळ पाहिजे. माझं खरंच चुकलं . जमलं तर माफ कर मला . "
पोटात तीळ तीळ तुटत होतं अभयच्या तसं बोलताना. पण पर्याय नव्हता. उगीच भावनेच्या भरात काही निर्णय घेऊन फायदा नव्हता. ओक्साबोक्शी रडायला लागली नेत्रा. खूप वाईट वाटले होते तिला. 
"नेत्रा , ऐक अग… "
"बास अभय , आता एक शब्दही नकोस बोलु. काहीच अर्थ नाही त्याचा." अभयला अर्धवट तोडत नेत्रा म्हणाली. आणि निघून गेली जड पावलांनी. 
खूप वाईट वाटत होतं अभयला. काय तो बाहुला बाहुलीचा खेळ . खूप चुकलं आपलं. अबोली सोबतच्या ब्रेक-अप ने एकटेपण आलं होतं . त्याच नाजूक क्षणी नेत्रा जीवनात आली , तिने थोडी काळजी घेतली आणि आपण त्याला प्रेम समजून बसलो. बिचारीच्या नाजूक मनाचं वाट्टोळ करून टाकलं आपण . ह्याला क्षमा नाही. 
तेव्हापासून नेत्राने त्याचे फोन घेणंही बंद केलं. अजिबात तोडून टाकलं अगदी. 
पंधरा दिवसांनी मंदारचा फोन आला. 
"अभ्या , माफ कर यार , नेत्रा वरून उगीच चिडवले तुला मी. पण खरच मला वाटलं कि तुमचं काहीतरी चाललंय "
"ओके , बोल कशी काय आठवण आली ?"
"अरे, नेत्राला सोडायला नाही आलास काल? गेली न सगळं सामान बांधून सुरतला ?"
"काय सांगतोयस, अचानक एकदम  ?"
"तुला नाही बोलली ती?"
"नाही रे "
"म्हणे , तिकडे जाउनच जॉब हुडकणार आहे ती. आणि सुरत म्हणजे फैमिली सोबत पण राहायला मिळेल."
फोन ठेवल्यावर खूप ओझे आले त्याच्या मनावर. अपराधी वाटायला लागले. उदास झाला एकदम तो. काहीच समजेना काय करावे. आपल्या हातून असं काही घडेल असा विचार पण नव्हता केला त्याने कधी. 
अबोलीही फोन उचलत नव्हती. सरळ तिच्या ऑफिस मध्ये गेला अभय त्यादिवशी . 
"काय चाललंय अबोली , का उलटं पालटा करून टाकलायस मला? फोन नाही उचलत. बोलत नाहीस. परत फोन करीत नाहीस. इमेल्स इग्नोर करतेस?"
"अभय , वेडा आहेस का ? नेत्राशी लग्न करतोयस न तू ? माझ्यापासून आता दूर झालं पाहिजे तुला. मी योग्य तेच करतेय"
"प्रेम करतेस कि नाही माझ्यावर? एवढंच सांग"
दोन सेकंदांचा पौज घेऊन अबोली म्हणाली 
"नाही करत ! तू स्पेशल आहेस. एकदम चांगला मित्र आहेस, आणि कदाचित कधी मी तुझ्यावर प्रेम केलं असेल पण. बट नॉट एनी मोअर. त्या दिवशी शिवसागर मध्ये भावनेच्या भरात बहकले मी. नाजूक क्षणी पाय घसरला माझा.  असो…  नेत्रा काय म्हणतेय? नीट काळजी घे तिची. "
तो नुसता तिच्याकडे पाहत उभा राहिला. काय बोलतेय ही ?
"आणि प्लीज आता या पुढून मला बोलायचा , भेटायचा प्रयत्न करू नकोस. एका चांगल्या नोटवर संपू दे हे सगळं"
डोक्यात मुंग्या आल्या होत्या त्याच्या. जाम रडायला येत होतं. हातपाय गार पडले होते. काही न बोलता तसाच निघून आला अभय तिथनं. सगळं गमावलं होतं त्याने. सगळं …… 

रात्री झोपेशी झगडावे लागू नये म्हणून भरपूर दारू ढोसून आला घरी. झोप लागली लवकर , पण चित्रविचित्र स्वप्नांनी थैमान घातले होते झोपेत. पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये नेत्रा त्याच्याकडे पळत यायची , तिचा हात तो हातात घेणार तोवर धाड धाड आवाज करत मुंबई सुरत एक्सप्रेस त्या दोघांमधून निघून जायची , ट्रेन गेली तर नेत्राच्या जागी अबोली उभी असायची. मागे पहिले तर अबोली आणि नेत्रा काळे गॉगल्स लावून हुंदके देत दूर जात असायच्या. हात जाम थंड पडलेले असायचे अभयचे. अशा स्वप्नांनी तळमळत होता नुसतं. 
लहानपणी खेळून आला कि जाम भूक लागलेली असायची अभयला.  "आई खायला दे काहीतरी" म्हणला कि आई नेहमीप्रमाणे म्हणायची "टेबलावर ठेवलाय बघ खाऊ . एक ताई साठी आणि दुसरी तुझ्यासाठी आहे वाटी!"  खरं तर त्या दोन्ही वाट्या त्याच्यासाठीच असायच्या.  तो जाऊन लगेच दोन्ही वाट्या मधला खाऊ फस्त करायचा. खूप मजा यायची, नेहमी काहीतरी सरप्राईज असायचे वाटीमध्ये. पेढे, गुलकंद , बोरं , द्राक्षे आणि बरच काही.   

तेवढ्यात आई आली स्वप्नात. म्हणाली "तुझ्यासाठी काहीतरी ठेवलाय बघ वाट्यांमध्ये टेबलावर".  फार उत्सुकतेने अभय गेला टेबलाकडे. पहिल्या वाटीवरचं झाकण काढलं तर रिकामी होती. घाईघाईत दुसरीवरचं पण झाकण काढलं आणि पाहतो तर काय तीही रिकामी. आणि मग मात्र अगदी जवळचं कुणीतरी गेल्यासारखं जीवाच्या आकांतानं ढसाढसा रडू लागला तो …… 
   


Friday, September 19, 2014

गुंतागुंत - (पार्ट -१)

खरंच , काश्मीरला स्वर्ग म्हणतात ते अजिबात खोटं नाहिये. आरामखुर्चीत बसून अभय विचार करत होता. त्या थंडगार हवेत , बर्फानी आच्छादलेल्या पर्वतांकडे बघत , गरमागरम चहाचे घुटके घेताना किती छान वाटत होतं. निसर्गाचं हे सौंदर्य पाहून, काल दिवसभर केलेल्या प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळून गेला होता. अभयला तर पहाटेपासून झोपच येत नव्हती. सगळी मित्रकंपनी अजून झोपूनच असेल म्हणून तो एकटाच हॉटेलच्या बाहेर येवून तिथल्या गार्डन कैफ़े मध्ये येवून बसला होता. काल रात्रीच बाकी मित्रांसोबत तो जम्मूला आला होता. तसा त्याचा यायचा मूड नव्हता पण मंदार, पुष्कर, सलील, परी आणि सगळ्यात जास्त नेत्राने खूपच आग्रह केल्यामुळे त्याला यावे लागले. चांगला आठ दिवस मुक्काम होता. भरपूर भटकायचा प्लान होता.

'अबोली असती तर काय मज्जा आली असती , नाही? बर्फ जाम आवडतो तिला' अभयनी विचार केला. हातातली सिगारेट संपून जोरात चटका बसला बोटांना, आणि खडबडून भानावर आला एकदम. बास त्या अबोलीचे विचार. वेड्यासारखा जीव लावून ठेवलाय आपणंच. तिच्या इच्छा, आकांक्षा काही औरच आहेत. शेवटच्या भेटीत तिने सरळ सांगितले. "हे बघ अभय, मला खूप आवडतोस तू, पण माझं करिअर माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. लग्न वगैरे गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये, आणि माझा विश्वास हि नाहीये त्यात. त्यामुळे तू मला विसरून जाणेच उचित. ह्यापुढे भेटायला, बोलायला नको आपण. उगीच त्रास होईल दोघांनाही". असं म्हणून एकदम कोरड्या चेहऱ्यानी उठून गेली तशीच कॉफी अर्धीच सोडून. असं कसं वागायला जमत हिला? आपल्याला कधी असं करताच नाही येत. अभयनी विचार केला. एकदम वेगळी आहे अबोली. क्षणात टिपकागदासारखी असते. आपल्यासाठी, प्रत्येक गोष्ट , प्रेम अगदी समरस होऊन करते. आणि क्षणात प्लास्टिकच्या कागदाप्रमाणे होऊन जाते. कोरडी एकदम. मग भावनांना वगैरे काही थारा नसतो तिच्याकडे. अजब रसायन आहे ही अबोली पण. कदाचित तिच्या ह्या अशा स्वभावामुळेच प्रेमात पडलो आपण तिच्या. ती जाऊन गाडीत बसेपर्यंत पाहत होता तिच्याकडे अभय. जाताना काळा गॉगल लावला होता तिने , ऊन खरच खूप आहे की डोळ्यातलं पाणी  लपवतेय ती? कळले नाही त्याला.

विसरून जायला हवे तिला , गेला एक महिना आपण फक्त आणि फक्त तिचा विचार करतोय. बास आता. जरी कितीही आवडत असली आपल्याला ती , तरी ह्या गोष्टीला काहीच भविष्य नाहीये. अबोलीचं हि बरोबर आहे. तिला तिचं करीअर घडवायचं आहे, आपल्यात गुंतून नाही पडायचंय. भूतकाळातून मनाला फरफटत परत आणलं अभयने. अबोलीचा चाप्टर संपलाय, आता आठ दिवस काश्मीर मध्ये धम्माल करायची. मज्जा करायची. तेवढ्यात, सगळीजण त्याला शोधत आली. गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत त्यांचे हसणे, खिदळणे, गप्पा सुरु झाल्या. आजच्या दिवसाची प्लानिंग सुरु झाली.

ग्रुपमध्ये , नेत्राशी त्याचं सगळ्यात जास्त जमायचं. चांगली मैत्रीण होती ती त्याची. अबोलीनंतर नेत्राच सगळ्यात जास्त जवळची.  अत्यंत चांगला स्वभाव , त्याहीपेक्षा चेहऱ्यावर सतत वावरणारे ते गोड हास्य.  अभयला तिच्याशी बोलताना अगदी कम्फर्टेबल वाटायचं. मनावर अगदी कसलच ओझं नसल्यासारखे वाटायचे. नेत्राही अभयच्या जोक्स्वर जाम फिदा. तिला खूप हसू यायचं अभयशी गप्पा मारताना. पण ती तेवढीच सेन्सिटीव होती. छोट्या छोट्या गोष्टी मनाला फार लावून घ्यायची. आयुष्यात तसं बरंच बरं वाईट पाहिलं होतं तिने. अवेळी हरवलेलं पालकांचं छत्र. जीवापाड प्रेम केलेल्या मोहित ने तोडलेलं ह्र्दय. त्यामुळे थोडं साहजिक होतं सेन्सिटीव असणं. पण कायम हसत रहायची. आणि तिच्या गालावरची खळी म्हणजे दुधात साखर.

जम्मू काश्मीर खरंच खूप देखणं आहे. अभय मंत्रावून गेला होता तिथलं सौंदर्य पाहून.अभयच्याच काय , तर सगळ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. डोळ्यात जमेल तेवढे सगळे साठवून ठेवत होते सगळेजण. जाम खुश होते हॉटेलवर परतल्यावर, थोड्या गप्पाटप्पा झाल्यावर अभय गेला आपल्या रुममध्ये. दिवसभर फिरून फिरून जाम थकला होता. बेडवर पडलं की लगेच झोप लागली त्याला. सकाळी जाग आली आणि अंग असं हे भट्टीसारखं तापलेलं. घणाचे घाव घातल्यासारखे डोके ठणठणत होते. खूप अशक्तपणा जाणवत होता. बहुतेक थंड हवामान सहन नव्हत झालं अभयला. न उठता तसाच ब्ल्यान्केट घेऊन पडून राहिला. आठ वाजता त्याच्या दारावर थाप पडली, ब्रेकफास्ट साठी बोलवायला आले सगळे त्याची वाट पाहून.  पाहतात तर काय अभय हुडहुडत बेडवर पडलेला. विचारपूस वगैरे केल्यावर सगळ्याचं मत पडलं कि डॉक्टर बोलावू रूमवरच आणि सगळे तोपर्यंत थांबतील त्याच्यासोबतच.
"काही नाही रे , थोडीशी कणकण आहे, एवढंच.  तुम्ही जा पाहू फिरायला तुमच्या प्लानप्रमाणे. मी बरं वाटेपर्यंत हॉटेल मधेच बसून राहीन. डॉक्टर पण बोलावून घेईन. हे बघा तुम्ही तुमचा प्लान चेंज केलात तर खूप वाईट वाटेल मला." अभय म्हणाला.
शेवटी अभयने खूपच विनवणी केल्यावर ते सगळे जायला तयार झाले. जाण्याच्या आधी त्यांनी डॉक्टर वगैरे बोलावून घ्यायला सांगितला हॉटेल मध्ये. आणि मग गेले निघून. थोड्या वेळात डॉक्टर येउन, औषधं वगैरे देऊन, आराम करायला सांगून, निघून गेला. अर्ध्या तासातच बेडवर पडून पडून वैतागून गेला अभय. अबोलीचे विचार लपत छपत हळू हळू त्याच्या मनात यायला लागले. अस्वस्थ होऊन गेला होता . "खरंच अबोली पाहिजे होती इथे आत्ता." असा विचार मनात येतानाच दारावर टकटक झाली. कोण असावे हा विचार करत अभयने दार उघडले. पाहतो, तर नेत्रा उभी बाहेर. 
"काय गं , काय झाले? इथे काय करतेयस तू?, परत का आलीस?"
"तू आजारी आहेस रे , कसला वैतागून जाशील एकटाच इथे बसुन. कोणी ओळखीचे न पाळखीचे.  मला नव्हत पटत तुला एकट्याला सोडून जाणे. म्हणून आले परत मी. चल आता कर आराम. "
"अगं , काहीही काय , तुझी ट्रीप माझ्यासाठी का खराब करतेयस?"
"मी आजारी असते तर तू काय केलं असतंस ?"
अभय गप्प झाला. त्याला स्वताची लाज वाटली. खर तर अबोली असती आपल्यासोबत आणि नेत्रा आजारी पडली असती , तर आपण आलो असतो का असच परत, कदाचित नाही. तरीही तो म्हणाला 
"हो , आलो असतो मी पण परत. "

एकदम बरे वाटले अभयला. कुणीतरी आपली एवढी काळजी करतंय हे फिलिंग फार छान वाटत होते. मनातून जाम खुश झाला तो. त्या दिवशी खूप गप्पा मारल्या त्यांनी. नेत्रा थोड्या थोड्या वेळानी त्याच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवत होती. वेळेवर औषधं देत होती. मधूनच गरमागरम कॉफी बनवून देत होती. त्यात तिचा तो हसरा चेहरा. त्याचं आजारपण संध्याकाळपर्यन्त कुठल्याकुठे पळून गेलं . संध्याकाळी हॉटेलच्या गार्डन एक रपेट पण मारली त्यांनी. आज बऱ्याच दिवसानंतर आनंदी वाटत होतं अभयला. रात्री जेवणं वगैरे झाल्यावर रूमवर गेला आणि विचार करायला  लागला. खरंच नेत्रा किती चांगली मुलगी आहे . कसल्या धम्माल गप्पा मारते. आणि तिच्या गालांवरची ती खळी , कसली छान दिसते हसताना. नेत्राला एवढं जवळून बघण्याचा, एवढ्या गप्पा मारण्याचा कधी योगच नव्हता आला या आधी. अबोली सोबत असली की आजुबाजूचं सगळं जग विसरून जायचा अभय. आज नेत्राचा सहवास सुखावून गेला होता त्याला. अबोलीच्या त्या शेवटच्या भेटीनंतर आलेलं एकाकीपण, त्याने त्याचं मन वैराण वाळवंट झालं होतं. आज कुठेतरी दूरवर पाण्याचा एक झरा दिसत होता. पण मृगजळ तर नव्हे ना ते? विचार करत करत झोपी गेला तो. अगदी लहान बाळासारखी झोप लागली त्याला त्या रात्री .

दुसऱ्या दिवशी सकाळी , सगळ्यांच्या आधी तयार होवून बसला होता अभय. अंगात नवीन चैतन्य आल्यासारखे वाटत होते. का माहित काय , पण नेत्राला भेटण्याची हुरहूर लागली होती. असं का वाटतेय ते मात्र कळेना त्याला. थोड्या वेळात नेत्रा पण आली कैफ़े मध्ये. न्हावून मोकळे सोडलेले ते लांबसडक केस, तजेलदार गुलाबासारखा तो टवटवीत चेहरा,  मोठ्या मोठ्या डोळ्यांवर उठून दिसणारी ती काजळाची लकेर , चेहऱ्यावरचे ते नेहमीचे हसू आणि ती खळी !  मिनिटभर बघतच राहिला तिच्याकडे तो. कालच्या राहिलेल्या गप्पा परत  सुरु झाल्या त्यांच्या.  ब्रेकफास्ट वगैरे आटपून गाडीत बसले ते. जनरली पुष्कर आणि नेत्रा सोबत बसायचे, पण आज घाईघाईत पुष्करला मंद धक्का देऊन गडबडीने अभयनी नेत्राजवळची जागा पटकावली. तिला ते समजलं वाटतं , ती अगदी जोरात हसली. एकदम ओशाळून गेला अभय. अंग चोरून बसला. पण दोन मिनिटात गप्पा मारून कम्फर्टेबल झाला तो.  

आज फिरून झाल्यावर त्यांची गाडी जरा लवकरच हॉटेल कडे वळली. हॉटेल मध्ये आज बार्बेक्यू पार्टी होती. मजा येणार होती. परतताना अभयला एकदम हुडहुडी भरून आली. 
"का रे काय होतंय ? परत बरं वाटत नाहीये का?"
"नाही गं , पण जाम थंडी वाजतेय"
"बघू, ताप आहे का?" असं म्हणून नेत्राने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. 
"नाही, ताप तर नाही वाटत आहे. हजार वेळा सांगून पण ग्लोवज घालत नाहीस तू हातात. थंडी वाजून आली असेल."
असं म्हणून नेत्राने त्याचे हात  हातात घेतले. "बघ, कसले थंड पडलेत हात तुझे!"
नेत्रांनी अभयचे दोन्ही हात घेऊन आपल्या हातात पकडून ठेवले. तिच्या मऊ हातांचा तो उबदार स्पर्श झाला , आणि एकदम ४४० वोल्टचा करंट बसला त्याला. एकदम स्तब्ध झाला तो. 
"दहा मिनिटात बरे वाटेल बघ " नेत्रा म्हणाली. 
हे असं काही अजिबात अपेक्षित नव्हतं अभयला. काही न बोलता दोघेही गप्प बसून राहिली. दहा मिनिटं काय, अर्धा तास झाला तरी त्याचा हात तिच्या हातातच होत. तीही आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून झोपी गेली होती. असं वाटत होतं ही बस थांबूच नये. अशीच चालत राहावी. अचानक गाडीचे करकचून ब्रेक्स लागले आणि दचकून नेत्रा जागी झाली. त्याचा हात सोडला तिने. 
"बरं वाटतेय का रे आता?"
अभय एकदम म्हणून गेला "हो बरं वाटतेय, पण का सोडलास हात? असू दे ना असाच प्लीज"
नेत्राच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम पालटले ,  "बापरे, काय चाललंय हे? वेड लागलंय कि काय मला?" असं म्हणून तिथून उठून परी शेजारी जाऊन बसली.  एकदम गडबडून गेला अभय. काय बोललो आपण हे. अबोली सोडून कुणीच नाही न आवडत आपल्याला? काय मूर्खपणा करतोय आपण? का एवढा नेत्राचा सहवास आवडतोय?ती बिचारी चांगुलपणाने आपला हात घेऊन बसली , आणि आपण काय हे थर्ड क्लास काहीतरी बोललो. एकदम अपराध्यासारखे वाटायला लागले त्याला.

रात्रीच्या पार्टीमध्ये दोघेही शांत शांत होती. कालचा मोकळेपणा कुठल्याकुठे पळून गेला होता. एकदम विचित्र काहीतरी होऊन बसलं होतं. रात्री झोपायला गेला तेव्हा विचारांनी नुसता तळमळत होता अभय. ह्रदयाची कुठलीतरी नाजूक तार छेडली गेली होती त्याच्या. नेत्राचे विचार , तिच्यासोबत मारलेल्या गप्पा, तिचा तो मोहक चेहरा, तिच्या हातांचा तो उबदार स्पर्श आठवून मनाला गुदगुल्या होत होत्या त्याच्या. सोबत वाईटही वाटत होते, कि आपण नेत्राच्या वागण्याचा गैरसमज करून घेतला . तिला आपली काळजी वाटते , आपली कंपनी आवडते.  पण याचा अर्थ असा नाही कि तिचं प्रेम वगैरे बसलंय आपल्यावर . आणि छे छे आपलं तर कुठे बसलंय प्रेम तिच्यावर? का खोटं बोलतोय आपण स्वतःशी ? असे हजार विचार करता करता झोपून गेला तो. 

दुसऱ्यादिवशी सकाळी नेत्रा ब्रेकफास्ट ला पण आली नाही. परी म्हणाली कि नेत्राला जरा बरं नाहीये म्हणून ती आज येणार नाही. अभय म्हणाला "तसं असेल तर मग मला थांबलं पाहिजे तिच्यासोबत. मी आजारी असताना ती परत आली होती. " मंदार नेहमीच्या खवचट पण गुणगुणायला लागला "दो दिल मिल रहे है , मगर चुपके चुपके" अभय भडकला एकदम . म्हणाला "मंद्या , फालतुगिरी नको करू, सुधार आता."कसंबसं पुष्कर आणि परीने दोघांना समजावून शांत केले.  सगळेजण गेल्यावर तो नेत्रा कडे गेला. तिला फारसं आश्चर्य नाही झालं त्याला पाहून. त्याला पाहून फक्त मंद स्मित केले तिनं.  काही बोलली नाही.
"काय झालंय नेत्रा ?"
"कुठे काय , काही नाही"
"हे बघ, मी जे काय बोललो ते मनापासून बोललो. बौटम लाईन हि आहे कि तू मला आवडायला लागली आहेस. मी अपेक्षा नाही करत कि तुझ्याकडून पण तसाच प्रतिसाद असावा. पण काही न झाल्यासारखे ढोंग करून राहणे मला जमत नाही. आणि तुझ्यासारखी मैत्रीण पण गमवायची नाही आहे. मला माफ करून टाक आणि परत आधीसारखे एकदम छान मित्र बनून राहु. विसरून जा मी बोललेलं."
"तू इथून जावं हेच उत्तम. प्लीज मला एकटीला सोड"
अभय तिथून निघून आला. मन हलकं वाटत होतं त्याला. मनातलं कमीत कमी बोलून दाखवले होते त्याने. टीव्ही बघत बसला तो. दुपारी दारावर टकटक झाली. अपेक्षेप्रमाणे नेत्रा आली होती. येउन बसली , त्याने छानशी कॉफी बनवली दोघांसाठी. शांतपणा असह्य होऊन अभय म्हणाला 
"नेत्रा , प्लीज सोडून दे. विसरून जा मी बोललेलं."
"लग्न करशील माझ्याशी ? मला वाटतं मी पण प्रेमात पडलेय तुझ्या"
अभय साठी हा एकदम बाउन्सर होता. "काय म्हणतेयंस ? लग्न ?"
"हो, माझे  काका माझे लग्न पुढच्या वर्षीपर्यंत लावून देतीलच. तेव्हा मला क्लिअर सांग. मी खरीच आवडते, तर लग्न करशील ?"
"हो , अर्थातच ". अभय बोलून गेला.
जाम खुश झाली. त्याला जवळ घेऊन त्याच्या गालावर हलकेच आपले ओठ टेकवून निघून गेली.
अभय विचार करू लागला. आपण केलं ते बरोबर तरी केलं ना ? एकदम लग्नाचं वचन वगैरे दिलं . अबोली आवडते कि नेत्रा आपल्याला? अबोलीने तर भेटायला, बोलायला पण मनाई केलीय. नेत्रा तिची जागा भरून काढेल का?
त्याच बेभानपणे आपण तिच्यावर खरच प्रेम करतो का? कि नेत्रा आणि आपण दोघेही परिस्थितीशी तडजोड करून अगदीच अनोळखी व्यक्तीसोबत लग्नाला तयार होण्याएवजी , कमीत कमी ओळखीचा, किंवा मित्र तरी जीवनसाथी मिळावा हा प्रयत्न करतोय ? विचारांचं वादळ उठलं डोक्यात. २१-२२ व्या वर्षी एवढी प्रगल्भता नसते विचारात. वेडा झाला विचार करून करून अभय. शेवटी ठरवले कि बास , नेत्राच आपले सर्व काही आहे आता. तिच्यासोबत संसाराची स्वप्न पाहण्यात मग्न होऊन गेला.
पुढचे चार दिवस कसे गेले आजिबात कळले नाही. नेत्रा आणि अभय एकदम सातव्या आस्मानावर होते. एकमेकांना जाणून घेतलं त्यांनी. आवडी निवडी, स्वप्नं. आता परत गेलो कि घरच्यांशी बोलून एखाद्या वर्षात लग्न करून टाकायचे. पण नियतीच्या मनातही तेच होतं का ?……… 

[क्रमशः] (टु बी कंटिन्यूड……. )  

Friday, September 12, 2014

झूठा ही सही !!!

ब्लॉग लिहायला सुरु केल्यापासून एक गोष्ट मला जाणवली कि मी लोकांना खूपच मागे लागून ब्लॉग वाचायला सांगायला लागलो होतो. लोकांची काय प्रतिक्रिया असेल ते जाणून घेतल्याशिवाय चैन पडत नव्हती. मला पण कळत नव्हते की मी असं का करतोय. बराच विचार केला, डोक्याला थोडा ताण देऊन विश्लेषण केलं , आणि अशी एक गोष्ट आठवली जी कदाचित याला कारणीभूत असू शकेल.
                         मी दहावीत होतो तेंव्हाची गोष्ट. आई वडिलांनी पुढच्या शिक्षणाचा विचार करून लातूरला शाळेत घातले होते मला. ती दोघेही किल्लारीलाच नोकरी करत. मी आणि माझी बहिण माझ्या एका मावशीकडे राहत असू. सर्वसामान्य पालकांच्या असतात, अगदी तशाच माझ्या पालकांच्या पण माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. त्यांना वाटायचे कि शहरात शिकतोय मुलगा, सगळ्या चांगल्या गोष्टी,सोयी, शाळा आहेत.  खूप अभ्यास करेल, चांगले मार्क्स पडतील. जेणेकरून पुढच्या जीवनाची घडीही नीट बसेल. मी पण पूर्ण प्रयत्न घेतच होतो, पण ते वयच थोडं पोरकट असतं , फारसं कळत नाही.
                       दोघेही, दर शनिवारी, दुपारी शाळा संपली की बस मध्ये बसून लातूरला यायचे. दोन्ही मुलं दूर असल्यामुळे जीव रमायचा नाही त्यांचा किल्लारीमध्ये. सोमवारी परत जायचे सकाळी. हळू हळू, आम्ही मावशीकडे सेटल झाल्यावर त्यांचं लातूरला येणं कमी झाले. मग महिन्या-दोन महिन्यातून आम्ही तरी किल्लारीला जायचो किंवा ते तरी लातूरला यायचे. अशाच एका रविवारी मी किल्लारीला निघालो. आठवडाभर सुट्टी होती शाळेला कसलीतरी. जाताना बस मध्ये काहीतरी वाचायला घ्यावे म्हणून सोबत एक पुस्तक घेतलं. "अक्षरशिल्पे" नाव त्याचे. कूणीतरी हातवळणे नावाच्या भावंडांनी दहावीच्या मराठी निबंधाच्या तयारीसाठी लिहिलेले पुस्तक होते. बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहिले होते. पुस्तक वाचून मंत्रमुग्ध झालो. फारच सुंदर भाषेत लिहिलेले होते ते निबंध. मनात म्हटलं "देवा , मला का नाही अशी कला दिलीस? का नाही अशी गोड भाषा येत मला ?" तासाभराच्या प्रवासात सगळं पुस्तक अधाशासारखं वाचून काढलं.
                          घरी पोचलो, तेव्हा आईने नेहमीप्रमाणे सगळे आवडीचे जेवण करून ठेवले होते. पोट भरून जेवण केले आणि झोपी गेलो. झोपेतनं उठलो तेव्हा पप्पा बाहेर गेले होते. आईही म्हणाली की हळदी-कुंकासाठी शेजारच्या पाटील काकूंकडे जाऊन येते. तिला परत यायला एक तासतरी लागणार होता. थोडावेळ टिव्ही बघून झाल्यावर बोअर झाले. एकदम "अक्षरशिल्पे" ची आठवण आली. आणि माहित नाही का , पण मनात एक लबाड विचार आला. आपण असे करू , त्यातला एक पावसाबद्दल अतिशय सुंदर निबंध होता. तो एका कागदावर उतरवून काढू. आणि आई-पप्पा घरी आले की  त्यांना दाखवू आणि सांगू की मीच लिहिलाय. मला खरंच नाही समजत मी तेव्हा तसं का केलं असावं. फुशारकी मारावी म्हणून ? की त्यांना बरे वाटावे की मला शहरात शिकायला ठेवल्याचं चीज झालं म्हणून ? की अजून काही? पण मी केलं तसं . दिवेलागणीच्या वेळी दोघेही एकदाच घरी आले. आल्यावर मी त्यांच्या हाती तो कागद ठेवला आणि म्हणालो "मी लिहिलाय बघा पावसावर निबंध , बघा कसा वाटतो तुम्हाला."  त्यांनी सोबतच वाचायला सुरु केला. जसे जसे ते वाचत होते तसा त्यांच्या चेहरयावरचा आनंद , कौतुक, अभिमान ओसंडून वाहत होतं. मी ते सगळे भाव टिपत होतो, आणि मला पण अगदी छान वाटत होते. निबंध वाचून झाल्यावर, अक्षरशः डोळे भरून आले त्यांचे. म्हणाले "काय हे? किती छान लिहिलयस. अभिमान वाटतो आम्हाला तुझा !". रात्री झोपताना सुद्धा त्यांच्या त्या निबंधावरच गप्पा सुरु होत्या. का माहित नाही, पण त्यांची फसवणूक केल्याचं आजिबात वाईट वाटत नव्हतं मला. कदाचित फारच स्वार्थी आणि आत्मकेंद्रित झालो होतो मी तेव्हा.
                              सोमवारी सकाळी जाग आली तेव्हा दोघेही शाळेत गेलेली. आरामात उठून आवरले आणि मित्रांना भेटायला बाहेर पडलो.  गावात ३-४ तास उंडारून झाल्यावर घरी परतलो. श्रावण सोमवार असल्यामुळे शाळा दुपारी लवकर सुटायची . घरी गेल्यावर आईने सांगितले " अरे तुझे पप्पा तुझा निबंध घेऊन शाळेत गेले होते.  वेळ काढून शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना वाचून दाखवला. अभिमानाने ऊर फुगला होता त्यांचा. सगळ्यांनी खूप कौतुक केले तुझे". माझे वडील फारसे बोलायचे नाहीत. कौतुक वगैरे तर फारच क्वचित. असे नाही कि त्यांना वाटायचे नाही पण बोलून दाखवायचे नाहीत कधी. आईने हे सांगितल्यावर मात्र माझ्या पायाखालची जामीन सरकली. वाटले, काय केले आपण हे. कुठपर्यंत  गेले हे प्रकरण? लाज वाटली पाहिजे आपल्याला असं काही करायला. पण आता चूक कबूल कशी करायची? कुठल्या तोंडानी सांगायचं त्यांना कि नालायक आहे मी . फसवले मी तुम्हाला. काय अवस्था होईल त्यांची हे ऐकून? अवघड जागेचं दुखणं होऊन बसलं हे तर. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. विचार केला, जाउदे आता हा विषय जास्त चघळण्यात अर्थ नाही. गप्प बसलेलेच बरे.
                     थोड्या वेळानी पप्पा पण घरी आले. आज फार खुशीत दिसत होते. बघवेना मला म्हणून परत बाहेर गेलो. मनात कुठेतरी काटा सलत होता आपण केलेल्या चुकीचा.  एक क्रिकेटची मैच खेळून घरी परतलो. दारात येताच छातीत धस्सं  झालं.  खुर्चीत बसून वडील पुस्तक चाळत होते …. "अक्षरशिल्पे " !!! घाबरून गेला जीव. ते चुल्लूभर पाणी कि काय म्हणतात त्यात बुडून जावं असं वाटलं. आई उदास होऊन भाजी निवडत होती. क्षणात माझ्या ध्यानात आला सगळा प्रकार , माझा पराक्रम त्यांना समजला होता.पप्पांनी फक्त एकदा माझ्याकडे पाहिले. थंड आवाजात म्हणाले "फार वाईट वाटले महेश आज मला. एवढी घोर फसवणूक ? काय गरज होती हे सगळं करण्याची. तुझी शैक्षणिक प्रगती , मार्क्स ह्या सगळ्यांपेक्षा तुझी वर्तणूक, विचार, वागणूक चांगली असावी हे महत्वाचे आहे.  एक चांगला माणूस नसशील तर बाकी गोष्टींना शुन्य किंमत आहे आमच्यासाठी. फार दुखावलंस आज, बेटा. " एवढे म्हणून ते शांत बसले. आईने एक चक्कर शब्दही काढला नाही.पप्पांना वाईट वाटल्याचं खूप दुखः झालं होतं तिला.  मला तर माझीच किळस वाटायला लागली होती. काय करून बसलो आपण हे?
                        रात्रभर झोप नाही आली. स्वतःच्या वर्तणुकी बद्दल तिरस्कार वाटायला लागला. पहाटे कशीबशी झोप लागली. सकाळी उठलो तर नेहमीप्रमाणे दोघेही शाळेत गेलेले.  घर खायला उठलं होतं मला. कालचा प्रसंग अस्वस्थ करून सोडत होता. काय करून आई-पप्पांना समजावू , कशी त्यांची माफी मागू हे प्रश्न भंडावून सोडत होते. पाच वाजता घराची कडी वाजली म्हणून दर उघडलं , आई होती. माझ्याकडे न पाहताच म्हणाली "पप्पा शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना घेऊन येत आहेत मागून. थोड्या खुर्च्या वगैरे बाहेर काढ. मी चहा ठेवते तोपर्यंत". मला समजेना कि सगळेजण का येतायत. नाना विचार मनात येवू लागले.  पाच मिनिटांनी सगळेजण घरी पोचले. चहा पाणी झाल्यावर, आलेल्या शिक्षकांनी मला बोलावले. "अरे काय तो निबंध लिही……" ; तेवढ्यात पप्पांनी त्यांचे वाक्य अर्धवट तोडले आणि म्हणाले , "एक मिनिट सर, एक गोष्ट सांगायची आहे त्या निबंधाबद्दल". माझी हवा टाईट!  मनात म्हटलं, लागला निकाल आपला आता.  एवढ्या सगळ्यांसमोर पाणउतारा होणार. अंगावर हजार झुरळे पळावी तसं काहीतरी फिलिंग यायला लागला. एकीकडे पप्पांचा राग पण यायला लागला कि एवढ्याश्या चुकीची एवढी मोठी शिक्षा काय.  एवढे कठोर होण्याची काय गरज आहे.
                     पप्पा पुढे म्हणाले "अहो माझं चुकलंच. महेशला त्याच्या  मित्रांनी एक खूप छान पुस्तक दिलंय वाचायला , त्याला आवडलं म्हणून त्याने एका कागदावर एक निबंध कॉपी करून घेतला . तो झोपला होता सकाळी तेव्हा मी सहज पहिला आणि मला वाटले कि त्यानेच लिहिलाय तो, आणि मी त्याच्याशी खातरजमा न करता उगाच शाळेत घेऊन आलो आणि  तुम्हाला दाखवला. "
"अर्रे  हो का , जाऊद्या , आपला महेश पण कमी नाही, त्याहीपेक्षा चांगले लिहील तो" असं काहीतरी म्हणत बाकीच्या शिक्षकांनी पण वातावरण हलके फुलके केले.  सगळेजण गेल्यावर मी पाय पकडले पप्पांचे , म्हटलं "माझे खरच चुकले. खूप मुर्ख आहे मी. " पप्पा नेहमीच्या अबोल स्वभावाप्रमाणे एवढेच बोलले "जाउदे, फार मनाला लावून घेवू नकोस. पण चूक कबुल करणे महत्वाचे.".
               पप्पांचा मोठेपणा कळला त्या दिवशी मला.  सगळ्या शिक्षकांसमोर चूक कबूल केली.  मुलाला वाईट वाटू नये , म्हणून चूक स्वतःवर घेतली. आणि, त्या गोष्टीचा उगाच बाऊ न बनवता माफ पण करून टाकले मला. एक गोष्ट कायमची शिकलो त्या दिवशी , फसवायचे नाही कुणाला. आणि अजाणतेपणे तसे झालेच, तर चूक कबूल करायला मागे पुढे नाही पाहायचे.
             कदाचित, म्हणूनच आज मी जेव्हा माझा ब्लॉग लिहितो , तेव्हा कुठेतरी मला वाटत असेल की आज मी हे खरंच मनाने  लिहितोय आणि लोकांनी वाचावे आणि त्यांना खरेच आवडावे मी लिहिलेलं. कदाचित तेव्हा केलेली चूक निस्तरण्याचा निष्फळ, व्यर्थ प्रयत्न करतोय मी.  तरीही , आई आणि पप्पा आज जिथेपण असाल तुम्ही , जमलं तर वाचा एकदा मी लिहिलेलं … या वेळी मनानी लिहिलंय सगळं ….

Tuesday, September 2, 2014

Happy new year!!!


पहाटेच्या त्या शांत वातावरणात , फारशी वाहतूक , वर्दळ नसलेल्या , पावसानी न्हावून निघालेल्या चकाकत्या रस्त्यावरून त्याची मोटारसायकल भन्नाट वेगात धावत होती . "मुंबई एकदम वेगळी दिसते न पहाटेच्या वेळी . फार कमी वेळी मुंबई ला दिवसातल्या ह्या वेळेस बघायचा योग येतो. दिवसभराच्या दगदगीनंतर कशी शांत, समाधानी दिसते. " तो विचार करत होता . मोबाईल ची रिंग वाजायला लागली , संतोष चा असावा फोन . आजीबात उशीर चालत नाही त्याला कुठेच . फोन न उचलता तशीच गाडी दामटत तो रेल्वे स्टेशन मध्ये घुसला . घाई घाईत, दिवसभराच्या पार्किंगचे पन्नास रुपये पार्किंग वाल्याच्या हातात कोंबत तो प्लाटफॉर्म कडे पळत सुटला . ग्रुप मधले सगळे मेम्बर्स आधीच पोचले होते.त्यांनी शिव्या द्यायला सुरु करण्याआधीच माफी मागत तो त्यांना सामील झाला . गप्पा गोष्टी, विनोद यांना उधाण आले होते. बऱ्याच दिवसांनी ग्रुप एकत्र जमला होता . प्रसंगच तसा होता . अक्षराचे लग्न होते आज पुण्याला . अक्षरा ग्रुप मधलीच एक . सगळ्यात पहिले लग्न होते ग्रुप मधल्या कुणाचे तरी . फ्रांस मध्ये काम करणारा एक देखणा मुलगा निवडला होता तिने . भारी एक्साईटमेंट होती प्रत्येकाला . 
                         "हाय गाईज , वोटस अप ?" असा एक मंजुळ निनाद किणानला. "ती", उभी होती मागे. परवाच परदेशातून परत आली होती वाटतं . ती पण येणार होती अक्षर च्या लग्नाला त्यांच्यासोबत .  ग्रुप मधल्या सगळ्यांच्या  तोंडातून आनंदाचे चित्कार उमटले . सगळ्यांनी तिच्याभोवती गलका केला . "कशी आहेस, सो गुड टू सी यु , काय म्हणतेय स्वित्झर्लंड ?" धाड धाड प्रश्नांच्या फैरी झडल्या तिच्यावर . त्यांच्या गप्पा रंगल्या असताना तो मात्र थोडं मागेच थांबला . नुसतं निरीक्षण करत होता तिचे . लालचुटुक रंगाचा तो ड्रेस , त्यावर खुलणारी ती चंदेरी किनाऱ्याची ओढणी . चेहऱ्याशी चाळा करणारे तिचे कुरळे केस . हल्कासा मेकअप . मंद दरवळणारे तिचे इम्पोर्टेड परफ्युम . "बदललीस गं अगदी तू . कसली छान दिसायला लागलीस . " कुणीतरी म्हणाले तिला . "खरंय "
तो मनाशी विचार करू लागला - "आधीपासूनच हि अशी जीवघेणी सुंदर , आणि त्यात परदेशातलं हवामान मानवलंय  हिला  खरं . अजूनही जास्त आकर्षक दिसतेय ही ".  मित्रांशी बोलता बोलता तिची नजर त्याच्या नजरेला भिडली , उधारीचं हसू चेहऱ्यावर आणत तिने त्याला "हाय!" केलं . त्यानेही चेहऱ्यावरची रेष हि हलु न देता मान हलवली. 
                           तेवढ्यात ट्रेन आली . "चला लवकर , नाहीतर अक्षराच्या मुलाच्या बारशाला पोचू अजून उशीर झाला तर!" असे पांचट विनोद वगैरे करत सगळेजण गाडीत चढले . ट्रेनमध्ये मुद्दामहूनच तो जेणेकरून ती दिसणार नाही अशा एका सीट वर बसला. गप्पाटप्पांना ओघ आला होता . तो मात्र आज अलिप्त होता . अजिबात मजा येत नव्हती. त्याचे ठेवणीतले sarcastic विनोद आज आटून गेले होते . सिगारेटचे झुरके घेत ट्रेन च्या दाराशी बराच वेळ बसून राहिला. तिच्यासोबत बसून तिच्याकडे दुर्लक्ष करणे त्याला जमणार नव्हते . एकदम ऑक्वर्ड  झाले असते. म्हणून उगीच झोपायचा वगैरे बहाणा करत थोडा दूरच बसून राहिला .   
          एकदाच पुणे आलं . स्टेशन जवळचं मंगल कार्यालय होतं . वेळेवर पोचले सगळे . अक्षता पाच मिनिटात पडणार होत्या . बाकी अक्षरा अगदी अप्सरेसारखी दिसत होती नवरीच्या पोशाखात . थोडं स्थिरस्थावर झाल्यावर ते सगळे स्टेज वर अक्षरा आणि तिच्या नवऱ्याला शुभेच्छा द्यायला गेले. अक्षराने थोड्या वेळानी एकदम त्याचा आणि तिचा हात पकडला आणि लटक्या रागाने म्हणाली  "आता अजून किती दिवस वाट बघणार आहात ? करिअर होतच असते. आता वाजवून टाका बार तुमचा पण . मला खूप मिरवायचं आहे तुमच्या लग्नात ". बहुतेक, गेल्या एक वर्षात काय काय घडलं त्याची कल्पना नसावी अक्षराला . तो आणि ती , दोघेही क्षणभर स्तब्ध झाली . कुणीतरी बोलावतंय असा बहाणा करून हात सोडवत तो तिथून निघून गेल. तिनेही तेच केलं असावं .  
                जेवणं वगैरे आटपल्यावर , सगळा ग्रुप अक्षरासाठी काहीतरी भेटवस्तू खरेदी करायला बाहेर पडला. खरेदी वगैरेसारख्या गोष्टींमध्ये त्याला फारसा इन्टरेस्ट नसल्यामुळे त्याने टाळले व तिथेच बसून राहिला. एका खुर्चीवर शांतपणे डोळे मिटून पडून राहिला. तेवढ्यात खांद्यावर एक थाप पडली . ओळखीचा स्पर्श जाणवला म्हणून मागे वळून पाहिले त्याने. "का रे , अगदीच बोलायचं नाही असं ठरवलंय कि काय ? एवढी अनोळखी झाले का मी ?" ती म्हणाली .  क्षणभर सुन्न झाला तो . खोटं हसून म्हणाला, "नाही गं , तसं आजिबात नाही . जरा डोकं दुखतंय म्हणून शांत आहे".  "मी ओळखते तुला चांगलं . प्लीज खोटं बोलू नकोस" ती म्हणाली . "बरेच दिवस झाले ना बोलून , कशी आहेस तू".  "अगदी मजेत आहे रे मी. ".  "बाकी एकदम वेगळी दिसायला लागलीय हं तू ".  "सुंदर म्हणायचय का तुला?" असं म्हणून ती नेहमीप्रमाणं जीवघेणं हसली. "बाकी तुझी नौकरी कशी सुरु आहे. काम कसे आहे ?" अशा बघता बघता गप्पा सुरु झाल्या . ५ मिनिटात सगळा अवघडलेपणा गळून पडला . खूप गप्पा मारल्या त्यांनी . किती बोलू नि किती नाही असं झालं होतं दोघांनाही.  एक तो अप्रिय प्रसंग (ब्रेकअप) चा सोडला तर बाकी सगळ्या गोष्टीवर गप्पा झाल्या . मन हलकं झाल्यासारखं वाटले त्याला . खंगून वाळणाऱ्या झाडाला नवी पालवी फुटावी तसं वाटू लागलं अचानक . तेवढ्यात तिच्या बाबांचा फोन आला . फोन झाल्यावर ती म्हणाली "बाबांची कार सर्विसिंग ला दिलीय आज , म्हणतायत कि, रात्री बस नि जाऊ स्टेशन वरून घरी ".  तो म्हणाला "कशाला, मी सोडीन तुला घरी . सांग त्यांना तसदी घेऊ नका म्हणून ". "ओके " ती म्हणाली . 
               परतीच्या प्रवासात दोघं सोबत बसली . बऱ्याच अजून गप्पा मारल्या. परत सगळे आधीसारखे वाटत होते त्याला. त्याच अवघड क्षणात कमजोर पडला तो. म्हणाला "आपण पूर्वीसारखं नाही होवू शकणार ? सगळं विसरून". डोळ्यात पाणी तरळले तिच्या एकदम . "नाही रे , सॉरी . पण I have moved on . तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी . पण तुझ्या शेवटच्या फोन वर आपली जी भांडणं झाली त्यात खूप काही बोलून गेलो रे आपण एकमेकांना . खूप खोलवर जखमा झाल्या आहेत मनाला . मला नाही सहन होणार आता परत काही तसे झाले तर . मी माझ्या जीवनात खुश आहे आणि तू तुझ्या . काही तक्रारी नाहीयेत जीवनाकडून आता".  बरोबर होतं तिचं . पण क्षणात ह्रदयाला भगदाड पडले त्याच्या . मन पिळवटून निघाले . खूप राग आला स्वतःचा . का आपण विचारले तिला . का स्वतः च्या स्वाभिमानाशी विश्वासघात केला?  विषादाने तो तिला म्हणाला " हाहा , तू काय सिरियस झालीस काय, अगं मी मजा करत होतो . मी पण प्रेम वगैरे गोष्टींपासून चार हात लांबच राहायचं ठरवलंय". ती काहीच बोलली नाही . मात्र , त्या क्षणापासून सगळे अवघडल्यासारखे होवून बसले.  संभाषण तिथेच खुंटले . 
            मुंबईला पोचायला रात्रीचे १० वाजले . पावसाची रिप रिप सुरूच होती. सगळ्या ग्रुप चे निरोप घेऊन झाल्यावर त्याने पार्किंग मधून गाडी काढली आणि तिला म्हणाला  "बस ".  तिच्या घराकडे प्रवास सुरु झाला मोटार सायकल वर.  किती वेळा हा सीन आधी रिपीट झाला होता .  कॉलेज संपलं कि रोज तिला घरी सोडायचा तो.  आज मात्र सगळं वेगळं होतं . रात्रीचं शांत वातावरण . दोघंही अबोल होती . सकाळचा अवघडलेपणा पुन्हा डोकं काढून वर आला होता . नेहमीप्रमाणे ती त्याला बिलगून बसली नव्हती , तिचे केस त्याच्या मानेला गुदगुल्या करत नव्हते , तो मोठमोठ्यांनी जोक्स सांगत नव्हता आणि ती खदखदून हसत नव्हती . पावसांत भिजून चिंब झाले होते दोघेहि. 
              शेवटी एकदाचे तिचे घर आले. खाली उतरून ती म्हणाली "Thanks . निघते आता मी . बघ जमलं तर अधून मधून फोन करत जा ". तो उगाच हो म्हणाला .  एक बॉक्स काढून तिने त्याच्या हातात ठेवला . "हे तुझ्यासाठी, माझ्या आवडीचे कफलिंक्स. " त्याने काही न बोलता ते आपल्या पांढऱ्या शुभ्र कुर्त्याच्या खिशात ठेवले. ती पाठमोरी झाली आणि चालायला लागली .  ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिथेच थांबून राहिला . गाडीला कीक मारून परत निघाला . पावसाने चांगलाच जोर पकडला होता आता . जाता जाता रस्त्यात एक बार उघडा दिसला . दारू न पिण्याचा निर्धार विसरून तो बार मध्ये जावून बसला . व्हिस्की चे दोन नीट पेग रिचवले . आणि बाहेर टपरी वर येवून सिगरेटचा कश मारायला लागला . तिच्या आठवणी राहून न राहून लाटांसारख्या त्याच्या मनाच्या किनाऱ्यावर धडकत होत्या . मधमाशांचे मोहोळ उठावे तशा त्याला डसत होत्या . फार एकटे वाटायला लागले त्याला एकदम . टपरीवरच्या रेडियो वर किशोर गुणगुणायला लागला . " हम बेवफा हर्गीझ न थे , पर हम वफा कर न सके… ". आता मात्र त्याला बांध अनावर झाला . घळाघळा अश्रू वाहायला लागले. पानवाल्याच्या "अरे क्या हुवा साहब . . . सब ठीक तो है ?" कडे दुर्लक्ष करून गाडीवर सवार होऊन निघाला . बास , आता तिला विसरूनच जायचे असा निर्धार केला स्वतःशी .  गाडी मुद्दामहूनच कॉलेज जवळून घेतली .  त्या कट्ट्याजवळ येउन थांबला . इथेच तासंतास बसून पावसाची रिमझिम उपभोगली होती दोघांनी कधी काळी.  कफलिंक्स काढून ठेवले कट्ट्यावर आणि सुसाट घरी निघाला . 
     घरी पोचून रेडियो ऑन केला .  आणि कच्चं भिजलेला कुर्ता काढला . पांढरा शुभ्र कुर्ता त्याचा मागून पूर्ण लालभडक झाला होता . तिचा तो लालचुटुक ड्रेस पावसात भिजून त्याच्या कुर्त्यावर आपली छाप सोडून गेला होता. तगमगत उठला तो . भरभरा बकेट मध्ये पाणी काढले , न मोजताच ४-५ चमचे सर्फ टाकलं आणि जीवाच्या आकांतानं डाग धुवून काढायाचा प्रयत्न करू लागला . पण रंग पक्का बेरकी , जायलाच तयार नाही .  अस्वस्थ झाला तो , आता घासून घासून , कुर्ता फाटायचाच बाकी राहिला होता . रंग काही निघायला तयार नव्हता . अगदी तिच्या आठवणीसारखाच… शेवटी कंटाळून, दमून , भागून मुळकुटं करून झोपून गेला बिचारा . रेडियो तसाच सुरु होता .  लता आपल्या जादुई आवाजात गातच होती….  

           "तेरे बीना जिंदगी से कोई ,शिक्वा , तो नहीं, शिक्वा नहीं, शिक्वा नहीं, शिक्वा नहीं . 
             तेरे बीना जिंदगी भी लेकिन , जिंदगी, तो नही, जिंदगी नही ,  जिंदगी नही, जिंदगी नही"
   

Wednesday, August 27, 2014

ये लाल रंग , कब मुझे छोडेगा ?


पहाटेच्या त्या शांत वातावरणात , फारशी वाहतूक , वर्दळ नसलेल्या , पावसानी न्हावून निघालेल्या चकाकत्या रस्त्यावरून त्याची मोटारसायकल भन्नाट वेगात धावत होती . "मुंबई एकदम वेगळी दिसते न पहाटेच्या वेळी . फार कमी वेळी मुंबई ला दिवसातल्या ह्या वेळेस बघायचा योग येतो. दिवसभराच्या दगदगीनंतर कशी शांत, समाधानी दिसते. " तो विचार करत होता . मोबाईल ची रिंग वाजायला लागली , संतोष चा असावा फोन . आजीबात उशीर चालत नाही त्याला कुठेच . फोन न उचलता तशीच गाडी दामटत तो रेल्वे स्टेशन मध्ये घुसला . घाई घाईत, दिवसभराच्या पार्किंगचे पन्नास रुपये पार्किंग वाल्याच्या हातात कोंबत तो प्लाटफॉर्म कडे पळत सुटला . ग्रुप मधले सगळे मेम्बर्स आधीच पोचले होते.त्यांनी शिव्या द्यायला सुरु करण्याआधीच माफी मागत तो त्यांना सामील झाला . गप्पा गोष्टी, विनोद यांना उधाण आले होते. बऱ्याच दिवसांनी ग्रुप एकत्र जमला होता . प्रसंगच तसा होता . अक्षराचे लग्न होते आज पुण्याला . अक्षरा ग्रुप मधलीच एक . सगळ्यात पहिले लग्न होते ग्रुप मधल्या कुणाचे तरी . फ्रांस मध्ये काम करणारा एक देखणा मुलगा निवडला होता तिने . भारी एक्साईटमेंट होती प्रत्येकाला .

"हाय गाईज , वोटस अप ?" असा एक मंजुळ निनाद किणानला. "ती", उभी होती मागे. परवाच परदेशातून परत आली होती वाटतं . ती पण येणार होती अक्षर च्या लग्नाला त्यांच्यासोबत .  ग्रुप मधल्या सगळ्यांच्या  तोंडातून आनंदाचे चित्कार उमटले . सगळ्यांनी तिच्याभोवती गलका केला . "कशी आहेस, सो गुड टू सी यु , काय म्हणतेय स्वित्झर्लंड ?" धाड धाड प्रश्नांच्या फैरी झडल्या तिच्यावर . त्यांच्या गप्पा रंगल्या असताना तो मात्र थोडं मागेच थांबला . नुसतं निरीक्षण करत होता तिचे . लालचुटुक रंगाचा तो ड्रेस , त्यावर खुलणारी ती चंदेरी किनाऱ्याची ओढणी . चेहऱ्याशी चाळा करणारे तिचे कुरळे केस . हल्कासा मेकअप . मंद दरवळणारे तिचे इम्पोर्टेड परफ्युम . "बदललीस गं अगदी तू . कसली छान दिसायला लागलीस . " कुणीतरी म्हणाले तिला . "खरंय "
तो मनाशी विचार करू लागला - "आधीपासूनच हि अशी जीवघेणी सुंदर , आणि त्यात परदेशातलं हवामान मानवलंय  हिला  खरं . अजूनही जास्त आकर्षक दिसतेय ही ".  मित्रांशी बोलता बोलता तिची नजर त्याच्या नजरेला भिडली , उधारीचं हसू चेहऱ्यावर आणत तिने त्याला "हाय!" केलं . त्यानेही चेहऱ्यावरची रेष हि हलु न देता मान हलवली. 

तेवढ्यात ट्रेन आली . "चला लवकर , नाहीतर अक्षराच्या मुलाच्या बारशाला पोचू अजून उशीर झाला तर!" असे पांचट विनोद वगैरे करत सगळेजण गाडीत चढले . ट्रेनमध्ये मुद्दामहूनच तो जेणेकरून ती दिसणार नाही अशा एका सीट वर बसला. गप्पाटप्पांना ओघ आला होता . तो मात्र आज अलिप्त होता . अजिबात मजा येत नव्हती. त्याचे ठेवणीतले sarcastic विनोद आज आटून गेले होते . सिगारेटचे झुरके घेत ट्रेन च्या दाराशी बराच वेळ बसून राहिला. तिच्यासोबत बसून तिच्याकडे दुर्लक्ष करणे त्याला जमणार नव्हते . एकदम ऑक्वर्ड  झाले असते. म्हणून उगीच झोपायचा वगैरे बहाणा करत थोडा दूरच बसून राहिला .   

एकदाच पुणे आलं . स्टेशन जवळचं मंगल कार्यालय होतं . वेळेवर पोचले सगळे . अक्षता पाच मिनिटात पडणार होत्या . बाकी अक्षरा अगदी अप्सरेसारखी दिसत होती नवरीच्या पोशाखात . थोडं स्थिरस्थावर झाल्यावर ते सगळे स्टेज वर अक्षरा आणि तिच्या नवऱ्याला शुभेच्छा द्यायला गेले. अक्षराने थोड्या वेळानी एकदम त्याचा आणि तिचा हात पकडला आणि लटक्या रागाने म्हणाली  "आता अजून किती दिवस वाट बघणार आहात ? करिअर होतच असते. आता वाजवून टाका बार तुमचा पण . मला खूप मिरवायचं आहे तुमच्या लग्नात ". बहुतेक, गेल्या एक वर्षात काय काय घडलं त्याची कल्पना नसावी अक्षराला . तो आणि ती , दोघेही क्षणभर स्तब्ध झाली . कुणीतरी बोलावतंय असा बहाणा करून हात सोडवत तो तिथून निघून गेल. तिनेही तेच केलं असावं .  

जेवणं वगैरे आटपल्यावर , सगळा ग्रुप अक्षरासाठी काहीतरी भेटवस्तू खरेदी करायला बाहेर पडला. खरेदी वगैरेसारख्या गोष्टींमध्ये त्याला फारसा इन्टरेस्ट नसल्यामुळे त्याने टाळले व तिथेच बसून राहिला. एका खुर्चीवर शांतपणे डोळे मिटून पडून राहिला. तेवढ्यात खांद्यावर एक थाप पडली . ओळखीचा स्पर्श जाणवला म्हणून मागे वळून पाहिले त्याने. "का रे , अगदीच बोलायचं नाही असं ठरवलंय कि काय ? एवढी अनोळखी झाले का मी ?" ती म्हणाली .  क्षणभर सुन्न झाला तो . खोटं हसून म्हणाला, "नाही गं , तसं आजिबात नाही . जरा डोकं दुखतंय म्हणून शांत आहे".  "मी ओळखते तुला चांगलं . प्लीज खोटं बोलू नकोस" ती म्हणाली . "बरेच दिवस झाले ना बोलून , कशी आहेस तू".  "अगदी मजेत आहे रे मी. ".  "बाकी एकदम वेगळी दिसायला लागलीय हं तू ".  "सुंदर म्हणायचय का तुला?" असं म्हणून ती नेहमीप्रमाणं जीवघेणं हसली. "बाकी तुझी नौकरी कशी सुरु आहे. काम कसे आहे ?" अशा बघता बघता गप्पा सुरु झाल्या . ५ मिनिटात सगळा अवघडलेपणा गळून पडला . खूप गप्पा मारल्या त्यांनी . किती बोलू नि किती नाही असं झालं होतं दोघांनाही.  एक तो अप्रिय प्रसंग (ब्रेकअप) चा सोडला तर बाकी सगळ्या गोष्टीवर गप्पा झाल्या . मन हलकं झाल्यासारखं वाटले त्याला . खंगून वाळणाऱ्या झाडाला नवी पालवी फुटावी तसं वाटू लागलं अचानक . तेवढ्यात तिच्या बाबांचा फोन आला . फोन झाल्यावर ती म्हणाली "बाबांची कार सर्विसिंग ला दिलीय आज , म्हणतायत कि, रात्री बस नि जाऊ स्टेशन वरून घरी ".  तो म्हणाला "कशाला, मी सोडीन तुला घरी . सांग त्यांना तसदी घेऊ नका म्हणून ". "ओके " ती म्हणाली . 

परतीच्या प्रवासात दोघं सोबत बसली . बऱ्याच अजून गप्पा मारल्या. परत सगळे आधीसारखे वाटत होते त्याला. त्याच अवघड क्षणात कमजोर पडला तो. म्हणाला "आपण पूर्वीसारखं नाही होवू शकणार ? सगळं विसरून". डोळ्यात पाणी तरळले तिच्या एकदम . "नाही रे , सॉरी . पण I have moved on . तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी . पण तुझ्या शेवटच्या फोन वर आपली जी भांडणं झाली त्यात खूप काही बोलून गेलो रे आपण एकमेकांना . खूप खोलवर जखमा झाल्या आहेत मनाला . मला नाही सहन होणार आता परत काही तसे झाले तर . मी माझ्या जीवनात खुश आहे आणि तू तुझ्या . काही तक्रारी नाहीयेत जीवनाकडून आता".  बरोबर होतं तिचं . पण क्षणात ह्रदयाला भगदाड पडले त्याच्या . मन पिळवटून निघाले . खूप राग आला स्वतःचा . का आपण विचारले तिला . का स्वतः च्या स्वाभिमानाशी विश्वासघात केला?  विषादाने तो तिला म्हणाला " हाहा , तू काय सिरियस झालीस काय, अगं मी मजा करत होतो . मी पण प्रेम वगैरे गोष्टींपासून चार हात लांबच राहायचं ठरवलंय". ती काहीच बोलली नाही . मात्र , त्या क्षणापासून सगळे अवघडल्यासारखे होवून बसले.  संभाषण तिथेच खुंटले . 

मुंबईला पोचायला रात्रीचे १० वाजले . पावसाची रिप रिप सुरूच होती. सगळ्या ग्रुप चे निरोप घेऊन झाल्यावर त्याने पार्किंग मधून गाडी काढली आणि तिला म्हणाला  "बस ".  तिच्या घराकडे प्रवास सुरु झाला मोटार सायकल वर.  किती वेळा हा सीन आधी रिपीट झाला होता .  कॉलेज संपलं कि रोज तिला घरी सोडायचा तो.  आज मात्र सगळं वेगळं होतं . रात्रीचं शांत वातावरण . दोघंही अबोल होती . सकाळचा अवघडलेपणा पुन्हा डोकं काढून वर आला होता . नेहमीप्रमाणे ती त्याला बिलगून बसली नव्हती , तिचे केस त्याच्या मानेला गुदगुल्या करत नव्हते , तो मोठमोठ्यांनी जोक्स सांगत नव्हता आणि ती खदखदून हसत नव्हती . पावसांत भिजून चिंब झाले होते दोघेहि. 

शेवटी एकदाचे तिचे घर आले. खाली उतरून ती म्हणाली "Thanks . निघते आता मी . बघ जमलं तर अधून मधून फोन करत जा ". तो उगाच हो म्हणाला .  एक बॉक्स काढून तिने त्याच्या हातात ठेवला . "हे तुझ्यासाठी, माझ्या आवडीचे कफलिंक्स. " त्याने काही न बोलता ते आपल्या पांढऱ्या शुभ्र कुर्त्याच्या खिशात ठेवले. ती पाठमोरी झाली आणि चालायला लागली .  ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिथेच थांबून राहिला . गाडीला कीक मारून परत निघाला . पावसाने चांगलाच जोर पकडला होता आता . जाता जाता रस्त्यात एक बार उघडा दिसला . दारू न पिण्याचा निर्धार विसरून तो बार मध्ये जावून बसला . व्हिस्की चे दोन नीट पेग रिचवले . आणि बाहेर टपरी वर येवून सिगरेटचा कश मारायला लागला . तिच्या आठवणी राहून न राहून लाटांसारख्या त्याच्या मनाच्या किनाऱ्यावर धडकत होत्या . मधमाशांचे मोहोळ उठावे तशा त्याला डसत होत्या . फार एकटे वाटायला लागले त्याला एकदम . टपरीवरच्या रेडियो वर किशोर गुणगुणायला लागला . " हम बेवफा हर्गीझ न थे , पर हम वफा कर न सके… ". आता मात्र त्याला बांध अनावर झाला . घळाघळा अश्रू वाहायला लागले. पानवाल्याच्या "अरे क्या हुवा साहब . . . सब ठीक तो है ?" कडे दुर्लक्ष करून गाडीवर सवार होऊन निघाला . बास , आता तिला विसरूनच जायचे असा निर्धार केला स्वतःशी .  गाडी मुद्दामहूनच कॉलेज जवळून घेतली .  त्या कट्ट्याजवळ येउन थांबला . इथेच तासंतास बसून पावसाची रिमझिम उपभोगली होती दोघांनी कधी काळी.  कफलिंक्स काढून ठेवले कट्ट्यावर आणि सुसाट घरी निघाला . 

घरी पोचून रेडियो ऑन केला .  आणि कच्चं भिजलेला कुर्ता काढला . पांढरा शुभ्र कुर्ता त्याचा मागून पूर्ण लालभडक झाला होता . तिचा तो लालचुटुक ड्रेस पावसात भिजून त्याच्या कुर्त्यावर आपली छाप सोडून गेला होता. तगमगत उठला तो . भरभरा बकेट मध्ये पाणी काढले , न मोजताच ४-५ चमचे सर्फ टाकलं आणि जीवाच्या आकांतानं डाग धुवून काढायाचा प्रयत्न करू लागला . पण रंग पक्का बेरकी , जायलाच तयार नाही .  अस्वस्थ झाला तो , आता घासून घासून , कुर्ता फाटायचाच बाकी राहिला होता . रंग काही निघायला तयार नव्हता . अगदी तिच्या आठवणीसारखाच… शेवटी कंटाळून, दमून , भागून मुळकुटं करून झोपून गेला बिचारा . रेडियो तसाच सुरु होता .  लता आपल्या जादुई आवाजात गातच होती….  

"तेरे बीना जिंदगी से कोई ,शिक्वा , तो नहीं, शिक्वा नहीं, शिक्वा नहीं, शिक्वा नहीं . 
 तेरे बीना जिंदगी भी लेकिन , जिंदगी, तो नही, जिंदगी नही ,  जिंदगी नही, जिंदगी नही"
   

Tuesday, August 26, 2014

अहो गोविंदशास्त्री!

रविवारची अशीच एक सुस्तावलेली दुपार. पोटास तड लागेपर्यंत जेवण झालेलं. एक छानशी वामकुक्षी झालेली . फावल्या वेळात काय करावं असा विचार करताना सुचले कि चला, आज सतीश मामाला फोन करावा. सातिशमामा माझा सख्खा मामा. एका खेडेगावी शिक्षकाची नौकरी करतो. बऱ्याच गमती-जमती सांगत असतो तिकडच्या . फोनवर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मामा म्हणाला "अरे एक सांगायचं विसरलो. तुझा एक बालमित्र भेटला मला २ दिवसांपूर्वी. कोण असेल सांग पाहू?". आता हे गेसिंग चे गेम मला फार बोर होतात , उगीच त्याचे मन राखण्यासाठी मी २ मिनिटांचा पॉज घेतला, आणि म्हणालो " नाही बाबा ओळखता येत, सांग तूच !". मामा म्हणाला "अरे , तो गोविंद!". माझी सुस्ती एकदम उडाली, उत्सुकता , कुतुहूल अनेक प्रश्नांनी मन भरून गेलं ग़ोविन्द्ला भेटून , त्याच्याबद्दल काही ऐकून जवळपास वीस वर्षं उलटली होती . टिपिकल हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात तसं मी काही वेळासाठी flashback मध्ये गेलो.



माझे शालेय शिक्षण झाले  एका अगदी छोट्या खेडेगावामध्ये . आई आणि वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे घरात थोडं शिक्षणाला पूरक वातावरण होतं . लहानपणापासूनच लिहिण्याची, वाचण्याची , अभ्यासाची गोडी होती . शाळेत एक बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी होतो. पण एक प्रॉब्लेम होता , मी कितीही घासून अभ्यास केला तरी नेहमी दुसरा नंबर यायचा वर्गात. कारण माझा मित्र गोविंद म्हणजे पहिला नंबर असं समिकरण होतं . अत्यंत कुशाग्र , तल्लख बुद्धीचा हा पोरगा. गणित म्हणजे तर त्याचा जीव कि प्राण . जणू आईच्या पोटातून शिकून आलाय. मोठी अवघड गणितं चुटकीसरशी सोडावयाचा .  माझी एक मावशी गोविंद घरी आला कि त्याला मजेत "अहो गोविंदशास्त्री!" अशी हाक मारायची . तो बिचारा कावराबावरा होऊन जायचा . मला जाम हसू फुटायचं .
                                 गोविंद माझा अत्यंत चांगला मित्र. आमच्यात कधी कोम्पीटिशन नसायची  . ( एक कारण हे हि होते कि तो फारच हुशार होता). पण तरीही त्या वयात जसा वाटतो तसा त्याचा हेवा वाटायचा कधीकधी . वाटायचं ह्याच्यामुळेच आपला कधी पहिला नंबर येत नाही. ह्याचा वडिलांची कुठेतरी बदली झाली पाहिजे, ह्याने शाळा बदलली पाहिजे असे एक नाही हजार विचार यायचे . आता विचार करून हसू येते. आमची मैत्री बाकी एकदम गाढ . दिवसभर त्याच्या घरीच पडीक असायचो . अस्सा मोठ्ठा वाडा . शेणाने सारवलेली जमीन. गोठ्यात दोन काळ्या कुळकुळीत दुभत्या म्हशी . ढणढणत्या चुलीवर भाकऱ्या थापणारी त्याची आई . त्याचे पहिलवान आजोबा . अगदी छान वातावरण होतं ते. खूप खेळायचो . एकत्र अभ्यास करायचो. भांडायचो हि  भरपूर , आणि दुसऱ्या दिवशी परत खास मित्र होवून जायचो.
                          नववीला असताना मी ते  गाव  सोडलं आणि जिल्ह्याचा ठिकाणी शिकायला गेलो . गोविंद तेथेच राहिला . हळूहळू नवीन मित्र झाले .  गोविंद ला विसरायला होवू लागले . दहावीचा निकाल लागला , मला बऱ्या पैकी मार्क्स पडले , अपेक्षेप्रमाणे गोविंद ला खूपच चांगले मार्क्स पडले . योगायोगाने आमचे एडमिशन  एकाच कॉलेजमध्ये झाले . एडमिशन चे सोपस्कार पार पडल्यावर त्याचे वडील त्याला घेऊन माझ्या घरी आले. माझ्या वडिलांनी विचारले "कुठले विषय घेतले तू गोविंद ?". यावर त्याच्या डोळ्यात पाणी तरळले . काहीच नाही बोलला तो. त्याचे वडील म्हणाले "Crop Science ! डॉक्टर बनवायचेय ह्याला . म्हणून गणित वगैरे नाही घेतले विषय . " माझे वडील म्हणाले " अहो , पण त्याला गणित एवढे आवडते ना ?, त्याला विचारले का तुम्ही ?" ते म्हणाले "त्याला काय विचारायचे , अहो ते देशपांडे डॉक्टर बघा , एका पेशंट चे २० रुपये घेतात  तपासायला . दिवसभर पेशंट ची रीघ असते त्यांच्याकडे . काय मान आहे गावात त्यांना . पैशांच झाड आहे झाड त्यांच्याकडे ". माझे वडील निरुत्तर झाले .
                       अधून मधून कधीतरी कॉलेज मध्ये भेटायचा गोविंद . उदास असायचा . गप्प गप्प राहायचा, फारसं बोलायचा नाही . माझ्या आई ला हे सांगितल्यावर म्हणाली " अरे , पहिल्यांदाच घराच्या बाहेर राहिलंय तो. नवीन शहर , नवीन कॉलेज . घराची आठवण येत असेल तत्याला . असं कर तू त्याला घरी घेऊन ये रविवारी . राहू दे इथेच दिवसभर . मन रमेल त्याचे ". त्या रविवारी घरी आला तो, पण शून्यात नजर लावून बसला . फार बोलला नाही . लगेच निघून गेला जेवण करून .  हळू हळू मी माझ्या जीवनात गुंतून गेलो. भेटी गाठी कमी झाल्या आमच्या . अकरावीचा निकाल लागला , गोविन्द्ची आठवण आली . निकालाच्या यादीत मात्र त्याचे नाव कुठेच नव्हतं . तोही कॉलेज  मध्ये दिसेनासा झाला होता .  काही दिवसांनी त्याचे वडील भेटले आम्हाला . गोविंद ची विचारपूस केल्यावर त्यांचा चेहरा खर्रकन उतरला . म्हणाले "वाया गेला पोरगा .वाट्टोळ करून घेतलं !  अभ्यास, कॉलेज सगळं सोडून दिवसभर देव्हारया समोर बसून असतो. कोणाशी बोलत नाही, काही नाही ". गोविंद वर कसला तरी अनामिक ताण, दडपण आलं होतं . मानसिक रित्या अस्वस्थ झाला होता तो. स्वतःभोवती एक कोश विणून घेतला होता त्याने. ४-४ तास देवाची पूजा करायचा . शिक्षण तेथेच सोडले त्याने !
                               काळाच्या ओघात मीही विसरून गेलो त्याला, आणि आज अचानक त्याची आठवण ताजी झाली .मामाला विचारले "कुठे भेटला तुला तो ? काय करतो सध्या ? कसा दिसतोय? " त्यांनी  सांगितले कि  मामाला शाळेच्या कामानिमित्त एक पार्सल पोष्टात द्यायचे होते.  पोष्टात चिटपाखरू नव्हते.  एक मळक्या युनिफॉर्म मधला पोष्टमन जमिनीवर पेपर अंथरून झोपला होता . (आजकाल खेडेगावी पण पोष्ट रिकामं असतं . मोबाईल फोन ची क्रांती! ). मामानी त्याला उठवलं आणि पार्सल दिले . पोष्टमन ने तंबाखू वगैरे मळली आणि गप्पा सुरु केल्या . बोलण्याबोलण्यात समजले कि तोच गोविंद होता . माझा बालमित्र . अगदी आपुलकीनं माझी विचारपूस केली त्याने . लग्न झालेले त्याचे, २-३ मुलं पण आहेत . कसाबसा संसाराचा गाडा ढकलतोय . अजूनही तास न तास देवाची पूजा करतो .  बोलण्यातून हे पण समजले, कि त्याच्या मनावर परिणाम झाला असं समजून घरच्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. मानसिक आजार बळावत गेला . कसेबसे लग्न उरकून टाकले, ह्या भ्रमात कि जबाबदारी पडल्यावर तर नीट वागेल. पण त्यात काही फारसा फरक नाही पडला .शेवटी कशीबशी , ओळखीने, त्याला एक पोष्टमन ची नौकरी लावली त्याच्या वडिलांनी . आणि संसार चा गाडा ढकलायला मदत केली .
                   त्याचा फोन नंबर घेतला मामाकडून आणि लगेच त्याला फोन केला . बायकोनी उचलला असावा . म्हणाली पूजा करत आहेत. नंतर करा २ तासांनी . परत  फोन केला . अगदी उत्साहात बोलला तो . शेवटी म्हणाला "फार पुढे गेलास महेश, तू मला मागे टाकून . मी बसलोय बघ इथे पत्रं वाटत, शिक्के मारत . " काय बोलावे समजेनासे झाले मला . उगीच  त्याला चांगले वाटावे म्हणून म्हणालो "काही म्हण यार, तुझ्यासारखा गणित तज्ञ नाही भेटला गोविंद".  एकदम उदासीन स्वरात तो उत्तरला "कशाचं काय राव, आयुष्याचं गणित चुकलं सगळं ".  गलबलून आलं आणि पुढे काही बोलावलं नाही . फोन ठेवून टाकला निरोप घेवुन.
              उगाच अस्वस्थ वाटायला लागले. विचार केला ह्या गोष्टीत चूक कोणाची? त्याच्या पालकांची, त्याच्या मनाविरुद्ध स्वप्नं पहिली त्यांनी म्हणून ? त्याला कधी समजून नाही घेतलं म्हणून .  कि गोविंदची चूक आहे, परिस्थिती समोर कमकुवत झाला म्हणून? कि त्या देव्हाऱ्यातल्या दगडाच्या देवाची, जो ढिम्म बसून सगळं पाहत बसला? गोविंद तासंतास हेच प्रश्न तर नसेल न विचारात त्या देवाला?
वाटले कि या वेळी भारतात गेलो कि वेळ काढून गोविंद ला नक्की भेटू . थोडा वेळ विचार केला आणि मग मात्र ठरवले कि नकोच. कधीच नको भेटायला त्याला. माझ्या आठवणींमध्ये असणारा गोविंदच बरा आहे. तो तसाच ठेवायचाय . मामाला केलेला फोन विसरून जायचा आहे . घराच्या छतावर हुंदडणारा , घातांक , अपूर्णांक , व्यास, क्षेत्रफळ यात रमणारा, (७५३ X ५६४ / ३६३) चे उत्तर क्षणात सांगणारा, तेजपुंज डोळ्याचा, "अहो गोविंदशास्त्री " म्हटलं कि लाजणारा गोविंद…  तो तसाच आठवणीत ठेवायचा आहे मला . तो पहिला नंबर अजूनही त्याच्याचसाठी राखून ठेवायचाय मला…!

[काही पात्रांची नाव बदलली आहेत. ]






    

Monday, August 25, 2014

ब्रम्हराक्षसाच्या पाठी …

भित्यापाठी ब्रम्हराक्षस ! ही म्हण शिष्यवृत्ति परीक्षेला ची तयारी करताना चौथी मधे बऱ्याच वेळा घोकुन घोकून पाठ केली होती. म्हणायला खुप मजेशीर वाटायची.  नजरेसमोर असा दंडुका घेतलेला राक्षस एका "फाटलेली हातात घेऊन" पळणाऱ्या माणसाचा पाठलाग करतोय अस दृश्य यायचं, पण म्हणी चा अर्थ बऱ्याच अनुभवानंतर उमगला.  


जीवनात, बऱ्याचदा काही गोष्टी , अडचणी अशा असतात की त्या पार पडल्याशिवाय , सोडवल्याशिवाय पर्याय नसतो. पण आपण काहीतरी कारण काढून त्यांच्याकडे दुर्लक्ष करात राहतो ,उद्यावर ढकलत रहतो. खरे कारण हे असते की एकतर ती गोष्ट करायला आपल्याला अजिबात आवडत नसते ( सुरु करण्याच्या आधीच आपण काहीतरी पूर्वाग्रह करून  घेतलेला असतो) , किंवा एखादी अनामिक भीती असते की ती गोष्ट आपल्याला करायला जमणार नाही.  हळुहळू ती  गोष्ट अंधाऱ्या खोलीमधला कधीच न पाहिलेला राक्षस बनून जाते. जसजसे दिवस जातात तसतसे आपण त्या खोलीसमोरून रोज जातो पण दुर्लक्ष करतो, घाबरतो. पण तो विचार, कि आपल्याला आज ना उद्या त्याचा सामना करावा लागणार आहे , आपल्याला अस्वस्थ करून सोडत राहतो. दिवसेंदिवस तो राक्षस आपल्या दुर्लाक्षावर , भीतीवर पोसत मोठा होत जातो. अस्वस्थपणाची पुट मनावर चढतच राहतात . दुसऱ्या चांगल्या गोष्टींवर पण तो हळू हळू आच्छदायला लाग्तो.

शहाणी लोकं शेवटी कधी न कधी त्याला सामोर जातात, त्या बंद खोलीचं दार उघडतात त्याचा सामना करण्यासाठी , आणि शंभरापैकी नव्याण्णव वेळी तो राक्षस नाही तर एक भित्रा मरतुकडा उंदीर निघतो. मग वाटते कि ह्याला आधीच चेचून टाकले पाहिजे होते, उगाच एवढ्या दिवस वाट पहिली, अस्वस्थ झालो. कितीतरी चांगले क्षण वाया घालवले ह्याच्या नादात. उलट कमकुवत लोकं आपलं सगळं जीवन अशा काल्पोकाल्पित राक्षसांना घाबरून वाया घालवतात. बरीच उदाहरणं पहिली आहेत मी.

हे सगळं सुचलं कारण ऑफिस मधलं एक काम बऱ्याच दिवसांपासून करायचे राहिले होते. रोज चालढकल करीत होतो. उद्यावर ढकलत होतो. खरं कारण होतं कि ते काम मला आजिबात आवडत नव्हते.  डेडलाईन तर जवळ जवळ येत होती.  दुसरी कामं करताना पण तो विचार नेहमी डोकं कुरतडत असायचा . आज ठरवले की बास ! आता काही झाले तरी हे काम हातात घ्यायचे. आणि आश्चर्य काय २-३ तासांत अर्धे काम संपले. पहिल्याच दिवशी याला सामोरं गेलो असतो तर किती बरं झालं असतं . असो. …

विक्रम जाचक म्हणून एक मित्र होता माझा बारावीत . तो नेहमी म्हणायचा कि मी कुठल्याही विषयाचा अभ्यास दोन वेळा सुरु करतो. म्हणजे पहिला चाप्टर वाचून सोडून देतो. का? कारण Well begun is half done. दोन वेळा सुरु केले कि  संपला पूर्ण अभ्यास. निकाल आल्यावर मात्रं त्याला साक्षात्कार झाला कि Aristotle ने त्याची घोर फसवणुक केली आहे.  विनोद बाजूला ठेवला तर विक्रम ची थेअरी बरयाच अंशी बरोबर आहे.  एखादे काम पहिल्यांदा करावेसे नाही वाटले तर परत करायला घेतले पाहिजे . काय माहिती , दुसर्या वेळी ते एवढे सोपे वाटेल की खरच संपून जाईल .

किती तरी गोष्टींचा मी पण ब्रम्हराक्षस बनवून ठेवला होता . मोठ्या शहरात शिकायला जाण्याचा, लहानपणी घरी एकटा झोपण्याचा , सकाळी हिंस्त्र कुत्री असलेल्या गल्ली मधून मार्ग काढत शिकवणी ला जाण्याचा , इंग्लिश बोलण्याचा , चार लोकांमध्ये आपली मतं मांडण्याचा , अनोळखी व्यक्ती सोबत संसार थाटण्याचा , न आवडणारी नोकरी सोडण्याचा , पहिला विमान प्रवास करण्याचा , पहिल्यांदा मुंबई ला एकटे जाण्याचा, जेवण बनवायला शिकण्याचा , अगदी जवळच्या मित्रांपासून, व्यक्तींपासून दूर होण्याचा … एक नव्हे हजार गोष्टी. जोपर्यंत त्यांना सामोरं नाही गेलो तोपर्यंत त्या प्रचंड अशक्य वाटायच्या .

भीती अजूनही बऱ्याच गोष्टींची वाटते . नाही असं नाही . पण अनुभूवांती हे माहिती झालाय कि फक्त त्यांना सामोर जाण्याचा अवकाश आहे . त्या आपोआप दूर होतात. घाबरून पळून जातात .  ती जाहिरात आहे न कुठली तरी…  "डर के आगे जीत है ". एकदम बरोबर !!!

चला मग उघडणार ना ते दार?
marathiblogs