Tuesday, December 23, 2014

असंच सुचलं म्हणून !

बरसणाऱ्या पावसाला पाहुन तुम्ही मनातनं भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका, हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत. पण अजूनही वेळ गेली नाहीये. बाहेर धो धो पाऊस बरसतोय, तो नेहमीसाठी असणार नाहीये. भिरकावून द्या ती छत्री आणि रेनकोट! आणि भिजून चिंब व्हा. ताण तणावाने काळवंडलेल्या, अदृश्य सुरकुतत्यांमागे लपत चाललेल्या चेहऱ्यावर झेला ते चमकते तुषार. गात्रागात्रामध्ये भिनू द्या तो थंडावा. निराशेची, असमाधानाची , काळजीची आवरणे वाहवून जाऊ द्या त्या ठिबकत्या अमृतात. चाखून पहा ती अवीट गोडी निर्मळ पाण्याची. पायातले ते पाश तोडून टाका. खोटे मुखवटे फाडून फेकून द्या. बेधुंद होऊन निरागस लहान मुलांसारखे नाचा. नाचताना तुमच्याकडे रोखलेल्या, कुत्सित हसणाऱ्या त्या नजरांची कीव करा. आयुष्याचा हा महोत्सव बेभानपणे साजरा करा.
ढगांकडून गडगडाटी हसणं शिका. विजेकडून तिचं लखलखणं शिकून घ्या. डोळे दिपून जातील सगळ्यांचे ,असं जगा. वाहत्या खळखळत्या पाण्याचा झरा व्हा, डबक्यासारखे साचून राहू नका. मनातलं साचलेलं सगळं वाहू द्या त्या झऱ्यासारखं. भन्नाट वाऱ्यावर मनाला डुलू द्या. त्याच्यासारखं गतिमान व्हा, आणि वेळ आली तर हळुवार फुंकर बनायला हि मागे पुढे बघू नका. ओल्या मातीचा गंध भरभरून लुटा. श्वासांमध्ये साठवून ठेवा त्याला. आयुष्यभर पुरणार तर नाहीचये तो गंध. पण हा क्षण सुद्धा परत नाही येणार आहे. हा पाउस पण नेहमीसाठी असाच मेहेरबान नसणार आहे. भिजणं रोज उद्यावर टाकत राहिलात तर एक दिवस तो उद्याचा दिवस पण नसणार आहे.
चिंब व्हा !!!

Sunday, December 7, 2014

देवाघरची फुलं !

आपल्या चमकत्या निळ्या शर्टाची झोळी करून त्यात एवढी मोठी हिरवी-नारंगी काशिबोरं कशीबशी सांभाळत तो माझ्याकडे आला.

"भैय्या , हे बगा काशिबोरं आणल्यायात तुमच्यासाठी.  आवडतेत का तुमाला?"
"अरे व्वा ! का नाही? खूप आवडतात मला. धन्यवाद. " म्हणून मी हातातली कॅरीबैग त्याच्यासमोर धरली. मोठ्या उत्साहाने शर्टातली सगळी बोरं त्यात उपडी केली.
"तुमच्या देशात मिळत्यात का हो बोरं ? नसतील तर हिकडून घेऊन जावा. पायजेल तेवढी हायत आमच्या बागेत."
"नाही रे आमच्याकडे कुठली मिळायला एवढी छान बोरं. पण आत्तापुरती एवढी बास झाली. "


ते निरागस , मधाळ स्मित परत त्याच्या चेहऱ्यावर चमकले. फारच गोड पोरगा होता तो.  फार झालं तर ७-८ वर्षाचा असेल.

"हातात काय घातलंयस रे ते. चमकतंय कसलं बघ ना !" मी विचारलं.
"हे व्हय ? सलमान खान ची फ़ैशन हाय. तेनं पण असलंच घालतोय कि हातात. वौन्टएड म्हणून एक पिक्चर हाय बगा त्याचा. "
"बरं बरं, एकदम सही! मी तरीच आल्यापासून विचार करतोय तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतेय. आत्ता आले लक्षात , सलमान खान सारखा दिसतोस एकदम तू."

मी त्याला उगाच म्हणालो. तसं पाहायला गेलं तर सलमान खान नावाचा मनुष्य काय घालतो आणि काय करतो त्याच्याशी माझं काही एक देणं घेणं नाही. पण एवढ्या गोड पोराला दुखावणं मला जमलं नसतं. अगदी लाजून गेला तो. काय बोलावे ते कळेना त्याला. उगीच इकडे तिकडे बघायला लागला. त्याचा अवघडलेपणा कमी करावा म्हणून मी उगीच विषयांतर केले.

"इकडे कधी आला तू?"
"म्हागल्या वर्षी. मी आन माझी बहिण, ती तिकडं थांबल्याय बगा ." बाजूला एका गोठ्यात गाईला गोंजारत असलेल्या एका ५-६ वर्षाच्या मुलीकडे बोट दाखवून म्हणाला तो.
"कुठून आलात तुम्ही दोघं ?"
"परभणीला एक होस्टेल होतं. बंद पडलं गेल्या वर्षी, तवा तिकडचे सगळेजण हिकडं आलो."
"आणि परभणीच्या होस्टेल मध्ये कोण आणून सोडलं तुम्हा दोघांना ?"
"पोलिसांनी!"
"काय , ते कसे काय ?"
"नदीत सोडलं होतं म्हनं आमच्या आई बापानी लहान असताना आमाला.  पोलिसांना सापडलो, आणि तेनी परभणी ला आणून सोडलं आमाला."
खाड्कन कुणीतरी थोबाडात मारल्यासारखं वाटलं मला. क्षणभरासाठी आजूबाजूचं सगळं गर्रकन फिरल्यासारखं झालं. काहीच बोलवेना. पोटात ढवळून आलं एकदम. 

"चल , क्रिकेट खेळू , ती बघ दुसरी सगळी पोरं टीम पाडतायत!" म्हणून मी त्याला तिथनं घेऊन चालू लागलो.
तेवढ्यात तिकडून गाईच्या गोठ्यातून ती गोड पोरगी -त्याची बहिण पळत आली आणि माझ्या हाताचे बोट धरून चालायला लागली.
"ओ , एक फोटू काडा कि माजा. " माझ्या गळ्यातल्या कॅमेरा कडे पाहत विनवणी केली तिने.
"का नाही ? कुठे काढू सांग? त्या बागेजवळ काढायचा?"
"न्हाई, हितंच काडा. मी एक कविता म्हणते , नाचता बी येतं मला."
तिचं ते बोलणं ऐकून खुद्दकन हसू आलं मला.
"एक काय पाहिजे तेवढे फोटो काढू. तू म्हण पाहिजे तेवढी गाणी आणि मस्त डान्स कर!"
पडत्या फळाची आज्ञा मिळाल्यासारखी धुंदीत पळत गेली आणि आपल्या गोड आवाजात एक कविता म्हणून नाचू लागली. एवढे निखळ , निरागस दृश्य चुकवणे शक्यच नव्हते. गळ्यातला कॅमेरा काढून मी कामाला लागलो.

"भैय्या , मी हात लावू का ओ तुमच्या कॅमेराला?" त्याने हळूच, बिचकत अपराधी सुरात विचारले.
"हो , घे ना. तुला फोटो काढायचे का तुझ्या बहिणेचे? हे बघ घे हा कॅमेरा."

 मी त्याला फोटो कसा काढायचा समजावून सांगितले. खूप मजा वाटली त्याला. तो मन लावून फोटो काढायला लागला, त्याची बहिण पण अजून जोर जोरात नाचू लागली. हळू हळू ते पाहून बाकीची सगळी मुलं जमा झाली. सगळीजण कॅमेरा हाताळू लागली, एकेमेकांचे फोटो काढू लागली. मनमोकळ्या हसण्याच्या आवाजांनी ती जागा भारून गेली.

सकाळी आलो तेव्हा हि सगळी पोरं अगदी बुजल्यासारखी होती. दुरूनच कुतुहुलाने पाहत होती. थोड्या गप्पा मारल्या , आणि एकदम मोकळी झाली सगळी.  छान बोलू लागली , धीटपणे प्रश्न विचारू लागली. स्वतःबद्दल सांगू लागली. आज दिवाळीचा दिवस, सगळ्यांनी नवीन कपडे वगैरे घातले होते.  हातात फटाक्यांचे पुडे वगैरे होते. जाम आनंदात होती सगळी पोरं. हासेगावच्या त्या गावापासून दूर निवांत जागी बांधलेल्या नंदनवनात आज चैतन्याचे वातावरण होते.

लातूर जवळ थोड्याच अंतरावर रवि बापटले नावाच्या एका मित्राने अतिशय कष्टाने , श्रमाने फुलविली आहे हि जागा. नाव पण साजेसं "सेवालय"! एचआयवी ( एड्स ) ची लागण झालेल्या पोरक्या मुलांचा सांभाळ करतात. सरकार ची एका पैशाचीही मदत न घेता. अपवाद फक्त मुलांची औषधं , जे सरकारी हॉस्पिटल नित्य नेमाने पुरविते.

घरदार, सुख , आराम सगळ्यांचा त्याग करून एकाच ध्येय डोळ्यासमोर ठेवून रवीने हे काम सुरु केले. एचआयवी बाधित जोडप्यांची मुलं पण बहुतेक संक्रमण झालेली असतात. आई वडील अर्थातच जास्त दिवस तग नाही धरू शकत. त्यानंतर हि मुलं अक्षरशः रस्त्यावर येतात. अशिक्षित जनता, रोगाबद्दलाचे गैरसमज यातून जवळच्या नातेवाईकांकडूनसुद्धा या मुलांना वाळीत टाकलं जातं. औषधोपचारांचा अभाव, हेळसांड, दुर्लक्षामुळे झालेला मनावरचा आघात या सगळ्यांशी सामना करायला तेवढी ताकत नसते त्या कोवळ्या जीवांमध्ये. आणि परिणामी नको तो शेवट होतो त्यांचा. एका मुलीबद्दल रवीने सांगितले कि तिला जीवनाबद्दल एवढी निराशा आली कि तिने तंबाखू खाल्ली एक दिवस खूप.  रागावून विचारल्यावर रडत म्हणाली कि "मला जगायचं नाहीये.  तंबाखू खाल्ल्यावर माणूस मरतो म्हणतात , म्हणून खाल्ली. "

"यांचं राहिलेले जीवन , जेवढे ही असो , सन्मानाने, हसत खेळत व्यतीत व्हावं. एवढीच एक इच्छा आहे माझी. योग्य औषधोपचार याचं जीवन मान बरंच लांबवू शकतात. आरोग्य तंत्रज्ञानात बरीच प्रगती झालीय. समाजाने यांचा स्वीकार करावा. सामावून घ्यावं यांना. लोकांच्या मनातून या रोगबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत. हाच हेतू आहे माझा" रवी बोलत होता.
"यांचं कॉलेज वगैरे झालं कि स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, म्हणून पण प्रयत्न करतोय मी. कारण आत्ता तरी यांची वय कमी आहेत. पण मोठी झाल्यावर यांच्यासाठी काहीतरी उद्योग मिळावा, म्हणून अजून थोडी जागा विकत घ्यावी म्हणतोय.  म्हणजे यांची लग्न वगैरे होतील, संसार थाटतील, आणि उपजीविकेसाठी काहीतरी उद्योगही असेल. "
खूप खुजं आणि लहान झाल्यासारखं वाटतं मला रविसोबत बोलताना. कसलं मतलबी आणि स्वार्थी जीवन जगतो न खरं तर आपण.  आपलं छोटंसं विश्व, तेवढ्यातच आपण केंद्रित असतो. अशा मुलांसाठी/ गरजू लोकांसाठी  "खरंच कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे." असं म्हणून थोडं वाईट वाटून घेऊन आपापल्या कामाला लागतो. म्हणूनच रविला त्रिवार सलाम.

आर्थिक गरज तर आहेच मुलांना. महिना १५००-२००० रुपये प्रत्येकाचा महिना खर्च आहे. ६०-७० मुलं आहेत सेवालायात.  बऱ्याच मुलांचं पालकत्व काही चांगल्या लोकांनी घेतलं आहे ( महिना १५०० रुपये मदत एका मुलासाठी). पण राहिलेल्यांसाठी अजूनही झगडावं लागतं. आणि हो आर्थिक गरजेसोबतच मला जाणवलं कि मुलांना त्याही पेक्षा जास्त गरज आहे जवळीकीची. त्यांच्याशी जावून गप्पा माराव्यात , त्यांच्यासोबत वेळ घालवावा, त्यांच्या गप्पा ऐकाव्यात. खूप आनंदी आणि समाधानी होतात हि मुलं त्यामुळं.

दिवाळी सारखा सण म्हणून बरेच नातेवाईक , मुलांना ४ दिवसांसाठी घरी घेऊन गेले होते. तरीही १०-१२ जण होते ज्यांना कुणीच नव्हतं.  तीच सगळी मुलं भेटली मला त्या दिवशी.
"काय होणार रे मग मोठ्ठा होऊन ?" मी सगळ्यांना प्रश्न विचारला.
"नर्स !"
"डॉक्टर!"
"सिस्टर!"
सगळ्यांची हीच उत्तरं. हि मुलं बाहरेच्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त डॉक्टर आणि नर्सेस लाच भेटतात. त्यामुळे स्वाभाविकपणेच त्यांना तेच बनायचेय मोठे होऊन.  तरीही, एवढ्या सगळ्या गोष्टीशी झगडत, एवढी आनंदी आहेत हि मुलं की काय सांगू? काय अधिकार आहे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचे दुखः मानत बसण्याचा. नको त्या फालतू गोष्टींचे टेन्शन्स घेऊन त्यांना गोंजारत बसण्याचा.  खरंच, खूप काही शिकण्यासारखं आहे या मुलांकडून.

काही फोटोज टाकले आहेत इथे. यातले बहुतेक(बरेच) फोटोज मुलांनी स्वतः काढलेले आहेत.

सेवालय 
                                     
रवी बापटले ! ध्येयवेडा माणूस …  
रवीने नंदनवन फुलवले आहे हासेगाव मध्ये. फुलं आणि बागा मन लावून वाढवल्या आहेत. 

मराठवाड्या सारख्या भागात पाण्याची समस्या नेहमीची. एक छोटासा तलाव बांधला आहे पावसाचे पाणी साचवण्यासाठी…  

मुलांना राहण्यासाठी, अभ्यासासाठी अशी साधीच पण छान कुटी बांधली आहे … 

(रविला बरीच गरज आहे. मोठा व्याप आहे, दिवसेंदिवस मुलांची संख्या वाढत आहे. मदतीची इच्छा असेल तर कळवा मला नक्की! )

Friday, December 5, 2014

कॉफी विथ करन !

"ड्रेस कसला सुंदर आहे गं तुझा ! इंडियाहून घेतलास का?"
"थैन्कस !  हो, मागच्या वेळी मुंबई ला गेले होते, तेंव्हा घेतला. ते पानेरी नावाचं एक छान दुकान आहे बघ अंधेरीला."
"अगदी कुछ कुछ होता है मधल्या काजोल सारखा आहे बघ ! आठवला ना ? "
"ओह, हो का ? नाही आठवत बुवा !"  सौ मनातून स्वतःच्या खरेदीवर खुश होत म्हणाली.

बायका, आणि त्यांचे निरीक्षण ! फक्त हिरोईन चे कपडे , दागिने , नवीन डिजाईन्स  इकडेच लक्ष असते. पिक्चर मरो तिकडे. असो…  लुसलुशीत पनीर कबाब वर मी अजूनच जास्त लक्ष केंद्रित केले आणि मन लावून खायला लागलो. तसंही चार बायका एकत्र आल्या कि त्यांच्या शॉपिंगच्या गप्पा ऐकणे यासारखी निरस गोष्ट कुठली नसेल. बीअर पण संपत आली होती. ती रिपीट करण्यासाठी वेटरला माझे डोळे चातकाप्रमाणे शोधत होते.  बायकांच्या गप्पा सुरूच होत्या.

"काय मस्त पिक्चर होता ना केकेएचएच ?"

जोरात ठसका लागला मला. माझ्या अभिप्रायाप्रित्यर्थ माझ्याकडे बघणाऱ्या चेहऱ्याकडे कसनुसे हसत बीअरचा एक घोट रिचवला. नाही म्हणावं तर रूड दिसेल, हो म्हणावं तर मन नाही मानणार. अशा वेळी ठसके कसे देवासारखे धावून येतात.

"करन जोहर किती छान सिनेमे बनवायचा ना आधी. पण काय झाले काय माहिती त्याला ? तो फालतू कभी अलविदा ना कहना बनवला. तेव्हापासून मी त्याचे पिक्चर बघायचं सोडून दिलं., नाहीतर काय ?"

गरमागरम कबाबला तोंडापर्यंत पोचवणारा माझा हात तिथेच थबकला. सहन करावं हो माणसानी , पण किती? चक्क कभी अलविदा ना केहना ला फालतू म्हणावं कुणीतरी? अंगात बाजीप्रभूंनी संचार करावा तसं वाटून संभाषणात आवेशाने उडी घेतली मी.

"का………य?, फालतू चक्क ? मला वाटते करन जोहर ने एकच चांगला आणि सेन्सिबल पिक्चर बनवलाय आणि तो म्हणजे कभी अलविदा न कहना!" मी तावातावाने म्हणालो .
"काही काय म्हणतोस. काहीही दाखवलंय त्यात. तो अभिषेक बच्चन एवढा चांगला असतो, आणि राणी मुखर्जी तरीही शाहरुखच्या प्रेमात पडते. असं कधी होत असते का ?
"हो ना, काय संदेश जातो असल्या पिक्चर मधनं. समाजावर काय परिणाम होतील."
"मूर्खपणा दाखवलाय सगळा !" 
"तसाच आहे तो शाहरुख, नेहमी दुसऱ्याची बायको नाहीतर प्रेयसी पळवतो. अगदी कुठलाही पिक्चर घ्या त्याचा!"

बघता बघता शत्रुपक्षाने चढाई केली. अगदी एकाकी पाडला मला सगळ्यांनी. मी काही बोलायच्या आतच एकजण   अस्मिताला  म्हणाली -
"सांभाळ गं बाई नवऱ्याला. नको तसले पिक्चर आवडायला लागलेयत त्याला !"
हास्याच्या फवाऱ्यात माझे शब्द हवेतच विरून गेले. त्यामुळे मी अजून काही बोलण्याचा नाद सोडून दिला आणि वेटरला पुढच्या बीअरसाठी इशारा केला.

पार्टी संपवून घरी आलो. पण ते संभाषण काही माझ्या डोक्यातून जायला तयार नव्हते. आता करन जोहर तसा बऱ्यापैकी सिनेमे बनवतो (म्हणजे तसा एकच). कुछ कुछ होता है एक बरा सिनेमा होता. मी इंजीनीअरिंग च्या शेवटच्या वर्षी असताना आलेला. तेव्हा ते वयच तसं होतं कि आवडावा सिनेमा.  नंतर थोडी समज यायला लागली तेव्हा त्या पिक्चर मधला फोलपणा अधिकाधिक ठळक व्हायला लागला. सगळी स्वप्नाची दुनिया. श्रीमंत बापांची श्रीमंत पोरं. पैसे कमवायचे/अभ्यासाचे टेन्शन नाही. 'प्यार दोस्ती है'  वगैरे डायलॉग मारत, हातावर टाळ्या आणि नाकावर टिचक्या देत , कोपरापर्यंत फ्रेंडशीप बैन्ड बांधून प्रेम करतात. डोकं फिरल्यासारखं ती काजोल लग्न न करता थांबते शाहरुखसाठी. जणू राणी मुखर्जी मरायचीच वाट बघत होती. राणी पण अगदी कन्विनिअन्टली टाईम वर देहत्याग करते. वर ती अति शहाणी ८ वर्षाची पोर, अकाली प्रौढत्व आलेली. आज्जीबाई सारखी बडबड करते. सलमानची एन वेळी फजिती करून शेवटी यांचं लग्न वगैरे. आकाशातले तारे वगैरे पण एकदम टाइम वर तटातटा तुटतात. अरे काय पांचट पणा लावलाय? असले पिक्चर पब्लिक ला जाम आवडतात. माझ्या एका मित्राने पिक्चर संपल्यावर अगदी मार्मिक विश्लेषण केलं होतं. म्हणाला

"एकदम अन एक्सपेक्टेड स्टोरी निघाली यार!"
"का रे ?"
"नाहीतर काय, हॉरर पिक्चर होता राव. राणी मुखर्जीचं भूत दाखवलंय त्यात !"

लोकांना असे पिक्चर आवडतात कारण लोकांना स्वप्नाची दुनिया आवडते. असं काही नसतं हे माहित असूनसुद्धा , माणसं स्वतःला त्या पिक्चर मध्ये कुठेतरी हुडकण्याचा प्रयत्न करतात.  स्वतःला सुखावून घेतात.  ताण तणावाच्या जीवनात तेवढेच थोडे विरंगुळ्याचे क्षण! खोट्या स्वप्नांमध्ये रमून जातात. हिरो हिरोइन चं सुखकर आयुष्य बघून,
हैप्पी एंडिंग्ज बघून समाधानी होतात.  सत्य परिस्थितीचा काही एक संबंध नसतो अशा पिक्चरचा.  संस्कार , समाजाला संदेश वगैरे म्हणाल तर त्या नावानं शंख आहे सगळा.  कसला संदेश देतो हो हा पिक्चर सांगा बरं मला. कुणाचेतरी लग्न सुरु आहे आणि तिथे जाऊन ते मोडून त्याच्या होणाऱ्या बायकोशी लग्न करा? आणि ते का तर , हिच्यापेक्षा जास्त कुणीतरी आवडत होती म्हणून आठ वर्षापूर्वी हिला नाकारली होती. आणि आता बायको मेल्यावर, लगेच चान्स मारून घ्यायचा.  कि ८ वर्षांच्या मुलांनी बापाचे हरवलेले प्रेम हुडकायचे, हा संदेश? की इकडे एखाद्याला लग्नाचे वचन देऊन , समर कॅम्प मध्ये जुन्या मित्राला भेटून पावसात नाचायचे वगैरे, ते पण नको तेवढे जवळ येउन.  कम ऑन , स्टौप फूलींग योरसेल्वज!

ढोंगी झालो आहेत आपण. स्वतःला फसवून फसवून एवढे एक्स्पर्ट झालोयत की , आता तसं काही करतोय ,त्याची जाणीव हि नाही राहिली. सत्य परिस्थिती चा सामना नाही करू शकत आपण. त्यापासून लांब पळतो. कारण सत्य आपल्याला आपण काय आहोत याची जाणीव करून देते.  आणि मग कारण नसताना अपराधाची भावना मनात येते. कोण सांगितलीय ती उठाठेव? म्हणून बरं का, आम्हाला ना कुछ कुछ होता है जाम आवडतो, पण कभी अलविदा न कहना … रीडीक्युलस, अगदी नो नो !

उलट , कभी अलविदा न कहना चे वेगळेपण ह्या अशाच सगळ्या पिक्चर्स मुळे उठून दिसतं. मी असं म्हणत नाही की अगदीच सुंदर चित्रपट आहे तो. पण दमदार कथा आहे. विचार करायला लावणारी. वास्तवातली.  सत्य परिस्थितीशी समझोता ना करणारी. आणि संदेश वगैरे म्हणाल तर ते काही पिक्चरच काम नाहीये हो. पिक्चर म्हणजे मनोरंजनाचे एक साधन आहे. त्यात कसला संदेश आलाय , डोंबल ! संदेश हवाय , चांगले विचार हवेयत तर चांगली पुस्तकं वाचा , देवभक्ती करा. भक्तीपर चैनल्स लावून बसा दिवसभर. संदेश कसला घेताय पिक्चर मधनं. त्यापेक्षा कॅमेरा वर्क एप्रिशियेट करा, लेखकाची ताकदवान स्क्रिप्ट पहा. तेवढ्याच कौशल्याने दिग्दर्शक ती कथा कशी मांडतो आपल्यासमोर ते बघा. कुठेतरी ह्रदयाला एखादा प्रसंग हलवून सोडतो की नाही ते बघा. मोजक्याच शब्दात बरंच काही सांगून जाणारे डायलॉग, त्याचं कौतुक करा. 

खूप बोलायचंय कभी अलविदा ना कहना वर. पण जास्त मोठे मोठे ब्लॉग नाही लिहायचे असं ठरवलेय. काहीजणांनी सुचवले की फारच लांबलचक होतात. म्हणून भाग-२ मध्ये "के ए एन के " बद्दलची माझी मतं ! लवकरच भेटीन !
(क्रमशः)

Wednesday, December 3, 2014

सावधान !

बऱ्याच दिवसांत काही लिहिणे झाले नाही. महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले नाही का? कारणं दोन त्याची. एक म्हणजे काही सुचतच नव्हतं. डोकं दुसऱ्याच गोष्टींनी व्यापलं होतं (म्हणजे अजून पण आहे) . दुसरं म्हणजे इंटरनेट कनेक्शन नव्हतं घरी. आता हॉंगकॉंग सारख्या ठिकाणी इंटरनेट शिवाय पंधरा दिवस म्हणजे थोडं विचित्र वाटेल ऐकायला! पण झालं तसंच. मोठी कहाणी आहे , परत कधीतरी.

अर्धशिशी (बरं राहिलं , शब्दार्थ: मायग्रेन) ने परत डोकं वर काढलं, आणि दोन दिवसांची सक्तीची विश्रांती पदरी पडली. सवय होऊन गेलीय आता त्याची. सुरुवातीला वैताग यायचा मायग्रेनचा, पण हळू हळू समजलं कसं डील करायचं त्याच्याशी ते. फार विचित्र नातं आहे माझं त्याच्याशी. पहिल्यांदा त्याची ओळख झाली माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी. हो! हळदीचा कार्यक्रम वगैरे उरकला आणि लग्नगावी जायची वेळ आली, आणि अचानक व्हिस्कीचे ४-५ नीट पेग मारल्यासारखं डोकं गरगरायला लागलं जाम. उमजेनाच की काय होतंय ते.

"पित्त हो , अजून काय ? मला पण होतं असंच अधून मधून. "
"करणी /भानामती तर नाही न गं केली कुणी?. चांगलं बघवत नाही लोकांना आजकाल. "
"दुपार पर्यंत चांगला होता हो. उन्हात अनवाणी जावं लागलं हळदी नंतर बाजूच्या मंदिरात. सहन नसेल झालं.  शहरात राहून नाजूक झालीत आजकालची पोरं. नाहीतर, आमच्या वेळी …. "
"अगं दुपारी एक फकीर आला होता दाराशी. काहीतरी पेटी वगैरे देऊन गेला ह्याच्या हातात, मेल्यानी काहीतरी जंतर मंतर तर नाही केले ना ? हा महेश पण पिडत होता त्याला किती वेळ!"
"नाही गं मावशी. मी होते न तिथे? तो फकीर आला न त्याने एक रुपयाचे नाणे मागितले त्याने महेशकडे. त्याच्या हातात दिल्यावर काहीतरी हातचलाखी करून त्याची गळ्यात घालायची पेटी बनवून महेशच्या हातात दिली त्याने. दक्षिणा म्हणून १० रुपये मागायला लागला.  महेश म्हणाला १० काय १०० रुपये देतो , पण जादू कशी केली ते शिकव मला. वैतागून निघून गेला बिचारा फकीर. "
"कुठंय ती पेटी , बघू इकडे." म्हणत मावशीने लांब कुठेतरी झुडपात भिरकावून दिली ती. भरभर देवघरातून थोडा अंगारा आणून माझ्या डोक्याला लावला.
"नजर काढ गं पोराची. बिना आईचं लेकरू. कुणी नजर पण काढत नाही. "
"हो , हो" म्हणत कुणीतरी मीठ मिरची घेवून आलं. भराभरा नजर काढली.
"शांत रहा! मी औषधं देते त्याला. स्ट्रेसनी होतं कधी कधी असं थोडी विश्रांती घेऊ द्या त्याला." कांचन सुटकेला धावून आली.

डोळे उघडून किलकिल्या डोळ्यांनी मी आजूबाजूला पाहिलं. ही गर्दी लोकांची! माझ्या डोकं गरगरन्याची कारणमीमांसा  आणि उपायांना ऊत आला होता नुसता. कुणी दिसतंच नव्हतं. आजूबाजूचं सगळं गोल गोल फिरत होतं. एकमेकांत मिसळून गेलं होतं. हातानीच खुण केली सगळ्यांना गप्प रहायची आणि परत डोळे मिटून शांत पडून राहिलो.

बघता बघता संध्याकाळ झाली. लग्न गावी निघायची वेळ झाली. उद्या दुपारचा मुहूर्त होता. निघणे गरजेचे होते.  कसाबसा उठलो, सतीश मामाच्या आधाराने बाथरूम मध्ये जाऊन तोंडावर पाण्याचा हात फिरवला. आणि कार मध्ये जावून बसलो. काहीच भान नव्हतं आजूबाजूचं. अस्मिता काळजीने परेशान झाली होती. तिच्याकडे पाहून कसेबसे हसून खोटा धीर देत होतो. ड्रायवर ने उदबत्ती वगैरे लावून गाडी स्टार्ट केली. आपली फेवरेट गाण्यांची सीडी ऐटीत लावून , गाडीला वेग दिला.

"ये दुनिया , ये मेहफील , मेरे काम कि नही !" रफी विव्हळायला लागला.
"बंद कर रे ते गाणे. काय सिच्युएशन आणि काय गाणी लावलियस ?" मामा ड्रायवर वर खेकसले.  हिरमुसून बिचाऱ्यानी गाणी बंद केली. मामावरचा राग एक्सलरेटर वर काढून भन्नाट वेगात गाडी पळवायला लागला.
   
दोन तीन तासांनी लग्नगावी पोचलो. गाडीच्या खिडकीतून बाहेर बघितलं.  सासूबाई हातात आरतीचे ताट वगैरे घेऊन उभ्या. सगळं लग्नघर स्वागतासाठी घराबाहेर जमलेलं. त्याचक्षणी मायग्रेनला भन्नाट ऊत आला. डोकं गरगरणे एकदम तीव्र झाले. कसाबसा मामाच्या खांद्यावर हात ठेवून मी बाहेर पडलो. 

अनपेक्षित होतं हो सगळ्यांना असं काही. नटून थटून थांबलेल्या लग्नघरातल्या मुली, स्वतःला ,हम आपके है कौन मधला सलमान समजणारी पोरं, अशाच काहीतरी सनसनीखेज गोष्टीची वाट पाहणारे शेजारी पाजारी, नातेवाईक सगळेजण आश्चर्यचकित होवून माझ्याकडे पाहत होते.

"जावई बापूंनी येताना रस्त्यातच घेतली काय थोडीशी ?" कुणीतरी कुजबुजले.
"अग्गं बाई, काय तब्येतीचा प्रॉब्लेम वगैरे आहे काय, लग्नाच्या आधी लपवून ठेवले होते वाटते."
"तरीच, हुंडा वगैरे नाही घेतला वाटतं"
"ही आय टी मधली जनरेशन असलीच बघा. मरमर कामं करायची आणि दारू ढोसायची. लग्नाच्या दिवशी तर कंट्रोल करावा कि नाही ?"
लोकांची कुजबुज सुरु झाली होती. मला मजा वाटत होती ऐकून. जाउन सरळ बेडवर लवंडलो. लागलीच डॉक्टर वगैरे आले, चेकअप वगैरे करून गेले. सगळ्यांची रीघ लागली माझी विचारपूस करायला. सासऱ्यांनी सगळ्यांना थोडे जोरातच बजावून सांगितले. "विश्रांती घेऊ द्या प्लीज त्यांना."

तेवढ्यात एका मित्राचा फोन आला.
"काय रे काय झालं ?"
"अरे काही नाही थोडीशी चक्कर येतेय आणि डोकं पण दुखतेय"
"च्यायला काय झाले? काय थोडीशी घेतली कि काय तू आज ?"
"वेडा आहेस का ? लग्नाच्या आधी महिनाभरापासून सोडून दिलीय मी."
"हम्म , आय नो वोट्स रॉंग, अरे काट्यानी काटा काढायचा.  एक काम कर तू २ पेग मार, चक्कर बंद होऊन जाइल."
काही न बोलता मी फोन ठेवून टाकला. मनाशी विचार केला की लग्न पोस्टपोन होणार आपले. अस्मिताची आणि तिच्या पालकांची जास्त काळजी वाटू लागली, कि एवढी तयारी केलेली, वाया जाणार सगळी. पर्याय नव्हता ना पण काहीच. विचार करता करता झोप लागली. गरगरणे अजूनही थांबले नव्हते.

सुदैवाने सकाळी जाग आली आणि मायग्रेन बराच कमी झाला होता. अस्मिता गरमा गरम कॉफी घेऊन आली. पिउन ताजेतवाने वाटले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे टेन्शन पण थोडे दूर झाले. आणि फायनली मी बोहल्यावर चढलो. 

रामदास स्वामी बोहल्यावर चढले आणि "सावधान" म्हणताच त्यांना ईशारा मिळाला असं म्हणतात. त्यांनी त्याच क्षणी तिथनं धूम ठोकली होती. देव सगळ्यांना तसाच वेगवेगळ्या प्रकारे इशारा तर देत नसेल?

ओके, ओके अस्मिता ! जोक होता हा ! आई गं , …. लाटणं लाकडी असलं तरी लागतं जोरात अगं !
marathiblogs