Sunday, October 12, 2014

गीत प्रेमायण… प्रेमात पडताना ( पार्ट १)

प्रेम म्हणजे प्रेम असतं .
तुमचं , आमचं सेम असतं …

प्रेम आणि गाणी, यांचा तसा बघायला गेलं तर खूप जवळचा संबंध. प्रेमात पडलेला माणूस काही विशेष गाणी खूप ऐकतो. वर अजून, आपल्या हिंदी पिक्चरचा परिणाम.  एकापेक्षा एक गाणी आहेत प्रेमाबद्दल . प्रत्येक प्रसंगासाठी एखादं गाणं हमखास सापडेलंच. अशीच काही गाणी नेहमीसाठी लक्षात राहतात.  असं, बऱ्याच दिवसांनी कधी एखादं गाणं ऐकण्यात येतं आणि मग रेशमाच्या लडी उलगडत जाव्यात तसा एखादा कालखंड किंवा प्रसंग डोळ्यासमोर परत उलगडत जातो. असं एखादं गाणं , वाऱ्याच्या हळुवार झुळूकीसारख्या मनावर कशा अलगद फुंकर मारून जातं. माझ्या आवडीची अशीच काही गाणी आणि त्या गाण्याबद्दलचं  माझं मत किंवा एखादी आठवण कुठेतरी नोंदून ठेवावी अशी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा आज पूर्ण करतोय.

माझ्या मते प्रेमाचा काळ ढोबळ मानाने तीन भागात विभागता येइल. प्रेमात पडताना, प्रेमात पडल्यावर आणि प्रेमानंतर ( म्हणजे एक तर लग्न किंवा दुसरं/पुढचं प्रेम !). हि गाणी एकदम जनरल आहेत. म्हणजे बरेच मित्र , मैत्रिणी, जवळची लोक , यांना वरच्या तिन्ही फेज मधून जाताना मी पाहिलेलं आहे.  ज्या प्रकारचं संगीत ऐकण्यात येत असायचं ते किंबहुंना सारखंच असायचं. कोण जाणे , इथलं एखादं गाणं तुमच्याही आठवणीतली एखादी नाजूक तार छेडेल.

१) ना जाने मेरे दिल को क्या हो गया … 

डीडीएलजे  मधलं हे गाणं ! पडद्यावर कुणी प्रेम करावं तर ते शाहरुख खाननंच. तसा मी अमिताभचा भक्त आहे, पण रोमांटिक सीन्स मध्ये शाहरुख खरंच अनभिषिक्त बादशाह आहे. त्यातल्या त्यात हा पिक्चर आणि हे गाणं तर एकदम भन्नाट! पृथ्वीच्या पाठीवरची बहुतेक प्रत्येक प्रेम कहाणी कदाचित अशीच सुरु होत असेल. तो आणि ती. बऱ्याचदा, भिन्न स्वभाव.  आणि काही कारणांनी एकमेकांसोबत बराच वेळ व्यतीत होतो. एकमेंकाशी बोलायला , सोबत वेळ घालवायला मन आतुर होतं. थोडावेळ ही तो किंवा ती नजरेआड झाली तर मनाला हुरुहूर लागून राहते. आरशात उगीच स्वतःला न्याहाळून बघण्यात तास न तास जातात. मनाला कळत नाही कि काय होतंय. मुखवट्या आडचे स्वभावाचे पैलू कळायला लागतात. आजुबाजूचं सगळं विसरायला होवू लागतं. हळूच नजरेच्या कटाक्षांची देवाण घेवाण सुरु होते. मनाला गुदुगुल्या होवू लागतात. सगळं जग कसं प्रसन्न वाटायला लागतं. आणि शेवटी तो दिवस उजाडतो वेगळं होण्याचा. पोटात गोळा येतो. मन भक्क उदास होऊन जातं. वाटतं कि वेळेनी इथेच थांबून जावं. पण आपण हतबल असतो.
आणि नंतर अगदी ह्या गाण्यासारखं सगळं होऊन जातं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. उदित नारायण आणि लताने अगदी जीव टाकून गायलंय हे गाणं. गाण्याचे बोल, संगीत , गाण्याचं चित्रीकरण, शाहरुख , काजोल सगळं कसं अगदी छान जमून आलंय. काहीच त्रुटी नाहीयेत ह्या सगळ्यात.

२) यु सैंग टू मी … 


मार्क एन्थनी, एक असाच साधारण गायक. काही फारसा यशस्वी वगैरे नाही झाला तो. पण एक गाणं आहे त्याचं. प्रेमात पडणं म्हणजे काय ते अगदी सुंदरपणे उलगडून दाखवतो. बराचसा वेळ सोबत घालवलेला, पण पुढच्याला अगदी "फॉर ग्रांटएड" घेतलेलं. आणि एका दिवशी अचानक साक्षात्कार होतो की अरे आपण तर प्रेमात पडलोय. कळालं कसं नाही आपल्याला? त्याची किंवा तिची किंमत ती नसताना कळते. जाणीव होते की तिच्याशिवाय बाकी कशातच अर्थ नाहीये. सगळं कसं अर्थहीन वाटायला लागतं . मन बंड करून उठतं. आणि निर्धार पक्का होऊन जातो की मनातलं प्रेम बोलून दाखवायचंच.  सुंदर गाणं आहे अगदी.

३) व्हेन यु आर गॉन … 


ब्रायन एडम्स राजा माणूस आहे. देवाने संगीताची देणगी भरभरून वाहिलीय पदरात. बरीच चांगली चांगली गाणी गायली आहेत त्याने. एकापेक्षा एक. पण हे गाणं मला अगदी वेगळं वाटत. जाम आवडतं. स्वतःच्या मनाला फसवत असतो आपण कि प्रेम वगैरे सगळं झूट आहे. पण दुसरीकडे मन अस्वस्थ होऊन गेलेलं. रेडीओ वर एखादं गाणं लागतं , तिची आठवण ताजी करून टाकतं. वैतागून आपण रेडीओ बंद करतो. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट राहून न राहवून मनाला छेडायला लागते. आपण त्या विचारांपासून जेवढं दूर पळू तेवढ्याच तीव्रतेने बूमरयांग सारखे परत येउन आदळायला लागतात. मन हतबल होऊन जातं. वेड्यासारखं आपण त्याच नेहमीच्या रस्त्यांवर ती भेटेल या आशेनी उगीच चकरा मारायला लागतो. सगळ्या जवळच्या लोकांमध्ये असूनपण एकटेपण कुरतडायला लागतं. शेवटी मन हार मानतं. आणि परिस्थितीला सामोरं जातं. ती /तो परत येण्याची वाट बघत बसतं. प्रेमाने जग व्यापून टाकलेलं असतं. मनानी स्वतःला पुढच्याच्या स्वाधीन करून टाकलेलं असतं. सगळं नियंत्रण सुटलेलं असतं. प्रेमाची गाडी भन्नाट वेगाने दौडू लागलेली असते.

४) ये दिल … दिवाना … 

सोनू निगमचं एक मास्टरपीस! बेताल झालेलं ह्र्दय. चुकतंय चुकतंय सांगून पण लहान मुलाप्रमाणे तिकडेच दुडूदुडू धावणारे मन. हजार वेळा समजावून पण न ऐकणारं हट्टी मन. स्वतःच्या पोराच्या सगळ्या चुका शेवटी पोटात घालतो त्याप्रमाणे अशा न ऐकणाऱ्या , हट्टी , जिद्दी मनाचं वर अजून कौतुक किती ते ! वर म्हणे काय करू , काही पाप थोडीच केलंय ह्या मनाने ! सांगतोय एवढं जीव तोडून , आता ऐकतच नाही तर काय करू? टेरिफिक आणि अगदी ठेका धरायला लावतं हे गाणं. माझा एक मित्र , क्यासेटच्या जमान्यात , दोन्ही साईड ला हेच गाणं रेकॉर्ड करून आला होता. आणि ती क्यासेट अविरत वाजत असायची टेपरेकोर्ड वर . सगळ्यांना अगदी तोंडपाठ झालेलं हे गाणं.

५) अब मुझे रात दिन … 

प्रेमात पडलेल्यांची कहाणी आहे हे गाणं. सोनू निगम चा मधाळ आवाज.  ह्रदयाच्या आतून गायलंय गाणं हे पठ्ठ्यानी. कुणीतरी माझ्या माहितीतलं. प्रेमात पडलं होतं आणि हेच गाणं परत परत ऐकायचं. पुढच्याला मनातलं सांगता तर येत नव्हतं. खोदून खोदून विचारल्यावर बऱ्याच दिवसांनी सांगितलं आम्हाला काय झालंय ते. पुढच्याला बघितल्या / भेटल्या खेरीज मनाला चैन पडत नाही. ह्रदयावर कसलंच नियंत्रण राहत नाही. प्रियकर /प्रेयसी म्हणजे सर्वस्व होऊन जातं. सगळ्या कक्षा, बांध पार पाडून वेडेपण शिगेला पोचतं. मनाच्या वीणेच्या तारा मधुर ध्वनी करायला लागतात.  प्रेमात वाहवून गेलेला असतो माणूस! सोनू निगम , टेक ए बो !

६) प्यार तो होना ही था … 


प्यार तो होना हि था. एक तद्दन भिकार चित्रपट. वर्षानुवर्षे अंघोळ न केल्यासारखा दिसणारा अजय देवगण आणि झोपाळलेली  काजोल. ए फ्रेंच किस ची भिकारडी कॉपी.  पण हे गाणं लाजवाब.  हो हो , माहितीय मला गाण्याची सुरुवातीची ट्यून ब्रायन एडम्सच्या "हैव यु रिअली लव्हड अ वुमन" वरून उचललेली आहे. पण त्याच्यामुळे गाण्याचं महत्व कमी होत नाही. गाणं ऐकून कुणी प्रेमात नाही पडलं तर नवलंच. अतिशय इंटेन्स कि काय म्हणतात तसं आहे हे गाणं.  नीट लक्ष देऊन ऐकाल तर गाण्यात जे सिम्पट्म्स आहेत ते कधीतरी तुम्हाला पण झाले असतील.  कुणीतरी मला म्हणालं होतं कि प्रेमात पडल्यावर पुढच्याची अगदी चुकीची गोष्टसुद्धा एकदम छान वाटायला लागते. काहीही केलं त्याने /तिने , अगदी कसं गोड वाटायला लागतं. कदाचित म्हणूनच प्रेम आंधळं असतं असे म्हणत असावेत.पुढच्याचे  सगळे प्रॉब्लेम्स आपले स्वतःचे वाटायला लागतात. स्वतःची प्रत्येक गोष्ट बैकफुट वर जाते, आणि पुढ्च्याचे साधे साधे प्रॉब्लेम्स कसे सोडवावेत ह्याचा विचार करण्यात सगळी एनर्जी खर्ची पडते.  पुढच्याच्या चेहऱ्यावर एक साधे हसू बघून जग जिंकल्याची , आत्यंतिक समाधानाची फिलिंग येते.  प्रेम एकदा तरी करावं बघून!

७) क्या करे क्या ना करे … 


प्रेमात पडलेल्या सगळ्यांची म्हणजे अगदी शंभर टक्के लोकांची हि स्थिती कधी न कधी तरी झाली असेल. आता किती जणांचं मनातच राहिलं आणि किती जणानी बोलून दाखवलं तो हिशेब वेगळा. सगळं ठीक आहे हो प्रेम झालं वगैरे , पण सांगायचं कसं ? सगळ्यात अवघड पार्ट कुठला असेल तर हाच. रेहमाननी सोनं केलंय ह्या गाण्याचं. प्रेमवीराच्या मनातली उलथापालथ ह्या गाण्यापेक्षा जास्त परिणामकारक रीतीने व्यक्त नसेल करता येणार. रोज मन ठरवत असतं आज बास झालं काही झालं तरी सांगून टाकायचं , आणि तो/ती समोर आला की शब्दच फुटेनासे होतात. गिळलेल्या आवंढयासोबत शब्दही गिळले जातात. तोंडाला कोरड पडते. हातपाय थरथरायला लागतात. आणि प्रेम व्यक्त करायचं उद्यावर पोस्टपोन होवून जातं. दिवसांमागून दिवस जातात आणि मन पिळवटून निघायला लागतं. सैर भैर होऊन जातो जीव.  राम गोपाल वर्मा , जागे व्हा! प्लीज असे काहीतरी सिनेमे बनव. काय करून घेतलयंस स्वतचं ?

असो , असा प्रवास पूर्ण होत , कधीतरी प्रेम व्यक्त केलं जातं. पुढ्च्यानी स्वीकार केला तर फेज टू मध्ये जातं. नाहीतर मनातंच राहून जातं. नकार दिला तर कुणी देवदास बनतं. तर कुणी रिपीट अटेम्पट करत फेज १चाच परत !

गाडी दुसऱ्या टप्प्यावर जेव्हा जाउन पोचते , तेव्हा वेगळीच गाणी ऐकली , गुणगुनली जातात. पुढचा पार्ट त्याच्यावरच लिहीन. तोपर्यंत … अलविदा !
एखादं तुमच्यापण ह्रदयाच्या अगदी जवळचं गाणं असेल तर कॉमेंट मध्ये टाकायला विसरू नका , नक्की!

No comments:

Post a Comment

marathiblogs